केंद्राच्या कारभारावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
पुणे – सध्या राज्यघटनेच्या चौकटीवर घाला घालण्याचे काम सुरु असून दुसरीकडे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या दुहेरी संकटाशी देशाला सामना करावा लागत आहे. राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला लक्ष्य करण्यात येत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर केली.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “लोकमान्य टिळक-आधुनिक भारताचे शिल्पकार’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मलेशियातील लीनकॉल्न विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू डॉ. अमिया भौमिक उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. श्री. ग. बापट, कुलगुरु डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी, मास कॉम विभागाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणेती टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक उपस्थित होते.
आजच्या राजकीय परिस्थितीत माध्यमांची भुमिका महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षण घेतल्यानंतर गुणवत्ताधारक पिढी तयार होईल. त्यामुळे विकासात्मक समाज निर्माण होईल. आज, देशासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नागरिक सुधारणा कायद्याविरोधात विद्यापीठातील विद्यार्थी, देशभरातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
नाविन्यपूर्ण व्यवसाय करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती बरोबरच त्याग देखील मानसाच्या अंगी पाहिजे. त्याशिवाय यशाच्या शिखरावर पोहचू शकत नाही. त्यागाची हीच गुरुकिल्ली ओळखून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.
व्यावसायिकांची सध्याची परिस्थिती पूर्णतः आभासी असून प्रत्येक व्यक्ती केवळ माझे आणि माझ्या पुरते, असाच विचार करून मानवी मुल्य पायदळी तुडवून पुढे जात आहे.
प्रतिकूल परिस्थिती व पुरेसी साधने उपलब्ध नसताना लोकमान्य टिळक जीवन जगले. आपल्याकडे सर्व साधने, तंत्रज्ञान उपलब्ध असताना देखील आपण आनंदी नाही. यश प्राप्त करायचे असल्यास त्याग करायला पाहिजे, असे डॉ.अमिया भौमिक यांनी सांगितले आहे. सूत्रसंचालन वसुंधरा पळशीकर यांनी केले. सुवर्णा साठे यांनी आभार मानले.