निर्देशांकांची दमदार आगेकूच
डॉलर कमकुवत झाल्यामुळे एफआयआयकडून खरेदी
मुंबई – किरकोळ महागाई सहा महिन्यांच्या निष्ठांवर गेल्यामुळे आणखी व्याजदर कपात निश्चित झाली आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतात खरेदी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात संमिश्र वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सलग तिसर्या दिवशी वाढले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे एफआयआयनी आणि मंगळवारी तब्बल 6,065 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सहा मुख्य चलनाच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर कमकुवत होऊन डॉलर इंडेक्स 99.39 अंकावर आला आहे. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 309 अंकांनी वाढून 77,044 या दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 108 अंकांनी म्हणजे 0.47 टक्क्यांनी वाढून 23,437 अंकावर बंद झाला. गुंतवणूकदारांनी आज बँकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. इंडसइंड बँकेचा शेअर तब्बल 7.12 टक्क्यांनी वाढला. या बँकेचे तिसर्या पार्टी कडून ऑडिट झाले असून बँकेच्या ताळेबंदामध्ये फक्त 1,979 कोटी रुपयांची त्रुटी आढळून आली आहे. ही तूट भरून काढण्यास बँक समर्थ असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या बँकेच्या शेअरची खरेदी वाढली.
पाऊस समाधानकारक पडणार
पाऊस समाधानकारक पडणार असल्याचे विविध हवामान संस्थांनी स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्राचा विकासदर वाढू शकतो. त्यामुळे एकूणच समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेतीविषयक कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी केल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
बँकांचे शेअर तेजीत
अॅक्सिस बँकेच्या शेअरचा भाव साडेचार टक्क्यांनी वाढला. अदानी पोर्ट्सच्या शेअरचा भाव 1.81 टक्क्यांनी वाढला. एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, एअरटेल, स्टेट बँक, आयटीसी या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले, मात्र मारुती, टाटा मोटर्स, लार्सन अँड ट्युबरो, एनटीपीसी, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
ताळेबंदाबबत आशावाद
व्यापार युद्धातही भारताची निर्यात बर्यापैकी वाढली आहे. त्याचबरोबर निर्यात आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. पाऊस चांगला पडणार असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेचा भारतीय कंपन्यांना आधार मिळणार आहे. चौथ्या तिमाहीचे ताळेबंद चमकदार असण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. यामुळेही खरेदी वाढली आहे.
जागतिक बाजारात संमिश्र वातावरण
जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. अमेरिका -चीन व्यापार युद्धामुळे आशियाई आणि अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले होते. युरोपियन शेअर बाजाराचे निर्देशांक फारसे वाढले नाहीत. मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. खनिज तेलाचे दर कमी पातळीवर आहेत. त्याचाही भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होणार असल्याचे विश्लेषकाने सांगितले.
व्यापार युद्धाचा भारताला फायदा
व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर इतर निर्देशांकाच्या तुलनेत भारतीय निर्देशांकांची हाणी कमी झाली आहे. चीन आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध बिघडणार आहेत. त्यामुळे याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होणार आहे. आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अमेरिकेला निर्यात वाढणार आहे. कारण चीनपेक्षा भारतावर अमेरिकेचे आयात शुल्क कितीतरी कमी आहे. त्याचबरोबर चीनला जाणारी परदेशी गुंतवणूक भारतात वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
00000000
सोने नव्या विक्रमी पातळीवर
जानेवारीपासून सोन्याच्या दरात 24 टक्के वाढ
नवी दिल्ली – अमेरिका – चीन या बलाढ्य अर्थव्यवस्थातील व्यापार युद्ध चिघळत चालले आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरऐवजी सोन्याचे आकर्षण वाढले आहे. यामुळे सोन्याचा दर 1 जानेवारीपासून एकतर्फी वाढून नव्या विक्रमी पातळीवर गेला.
दिल्ली सराफात सोन्याचा दर बुधवारी 1,650 रुपयांनी वाढून 98,100 रुपये प्रति दहा ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर गेला. चांदीचा दरही 1,900 रुपयांनी वाढून 99,100 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. व्यापार युद्ध निवळत नाही तोपर्यंत या दोन धातूच्या दरात वाढ होत राहण्याची शक्यता आहे. त्यातच डॉलर कमकुवत होत असल्यामुळे डॉलरकेंद्री उत्पादनातील गुंतवणूक कमी होत आहे. याचा फटका अमेरिकेच्या कर्जरोख्यांना बसत आहे.
एक जानेवारीपासून सोन्याचा दर आतापर्यंत 18,710 रुपयांनी म्हणजे 23.56 टक्क्यांनी वाढला आहे. एक जानेवारी रोजी सोन्याचा भाव 79,310 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. सोने उच्च पातळीवर गेल्यामुळे आता गुंतवणूक म्हणून चांदीची खरेदी वाढत आहे. अशा परिस्थितीत चांदीचे दरही वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
एलकेपी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, देशातील आणि परदेशी वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत असल्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याचा दर 2.12 टक्क्यांनी वाढून 95,435 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर वाढून 3,318 डॉलर प्रति औस या पातळीवर गेला आहे.
अमेरिकेने चिनी वस्तूवर 245 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली तर चीनने अमेरिकेतून बोईंग विकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर दुर्मिळ खनिजाची निर्यात चीन अमेरिकेला करणार नाही. चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर दिल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले असून या दोन देशात व्यापार युद्ध वाढत जाणार असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत अमेरिकन वित्तीय साधनाऐवजी सोन्यात गुंतवणूक करणे गुंतवणूकदार पसंत करीत आहेत.
00000000
रुपयाच्या मूल्यात वाढ चालूच
रुपयाच्या दरात झाली 12 पैशांची वाढ
मुंबई- अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आयात शुल्क धोरण चालू ठेवण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुराग्रह चालूच आहे. अशा परिस्थितीत डॉलर वेगाने कमकुवत होत आहे. त्याचबरोबर व्यापार युद्धामुळे खनिज तेलाचे दर 65 डॉलर प्रति पिंपापर्यंत आले आहेत. परिणामी परदेशी गुंतवणूक भारतात वाढत आहे. या कारणामुळे रुपयाच्या मूल्यात वाढ चालूच आहे. बुधवारी रुपयाचा दर 12 पैशांनी वाढून 85 रुपये 68 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला.
चलन व्यापार्यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी व्यापार युद्धाच्या काळातही बरीच पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन आणि अमेरिकेचे संबंध बिघडत असल्यामुळे अमेरिकन बाजारपेठेचा भारतीय निर्यातदारांना लाभ होण्याची शक्यता वाढली आहे.
त्याचबरोबर जागतिक विकास दरावर परिणाम होणार असल्यामुळे खनिज तेलाचे दर कमी होत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के खनिज तेल आयात करतो. यासाठी भारताला कमी डॉलर मोजावे लागतील. त्यामुळे रुपयाच्या मूल्यात वाढ होत असल्याचे दिसून येते. त्या उलट अमेरिकेचा डॉलर कमकूवत होत असून सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स बुधवारी 0.57 टक्क्यांनी कमी होऊन 99.39 या पातळीवर आहे.
0000000
पुरवठा थंडावल्यामुळे घर विक्रीत 19 टक्क्यांची घट
जानेवारी – मार्च दरम्यान घरपुरवठा दहा टक्क्यांनी कमी
नवी दिल्ली – जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये घरांची निर्मिती कमी झाली. त्याचबरोबर घरांचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत या तिमाहीत घरांची विक्री 19 टक्क्यांनी कमी होऊन 98,095 युनिट या पातळीवर आली असल्याची माहिती प्रॉप टायगर या संस्थेने जारी केली आहे. विकासदर मंदावत असल्यामुळे खरेदी करणार्यांची संख्या कमी झाली आहे. त्यातच विकासाकांनी घरांची निर्मिती कमी केली आहे. मात्र आता व्याजदर कमी झाले असल्यामुळे आगामी काळात परिस्थिती सकारात्मक होऊ शकते.
पहिल्या तिमाहीत घरांचा पुरवठा दहा टक्क्यांनी कमी झाला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, जागतिक व्यापार युद्धामुळे विविध क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना गुंतवणूकदार किंवा खरेदीदार सावध पवित्रा घेत आहेत.
करोनानंतर भारतीय बांधकाम क्षेत्र वेगाने आगेकूच करीत आहे. सध्या जागतिक व्यापार युद्धाचा या क्षेत्रावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. मात्र सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. त्याचबरोबर रिझर्व बँक व्याजदरात कपात करीत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील घडामोडी काही प्रमाणात वाढत राहण्याची शक्यता आहे.
अग्रवाल यांनी हे स्पष्ट केले की. आम्ही संकलित केलेली आकडेवारी फक्त घर विक्रीची आहे. घरांच्या फेर विक्रीचा यात समावेश करण्यात आलेला नाही. विकासकाकडील इन्व्हेंटरी बरीच कमी झाली आहे. त्याचबरोबर जागतिक परिस्थिती नकारात्मक आहे. अशा परिस्थितीत पुढील घडामोडीचा आढावा घेऊन विकसक आपल्या योजना आखण्याची शक्यता आहे.
मात्र एकूण बांधकाम क्षेत्रातील वातावरण अजूनही सकारात्मक पातळीवर आहे असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक व्यापार युद्धामुळे घरासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमती जास्त वेगाने वाढणार नाहीत. त्याचबरोबर व्याजदर कमी पातळीवर येणार आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात या क्षेत्रातील हालचाली वाढू शकतात. मुंबईत मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याचा समावेश आहे. तर दिल्ली एनसीआरमध्ये गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद, फरीदाबादचा समावेश आहे.
00000
चीनकडून बोईंग संदर्भातील वृत्ताचा इन्कार
अमेरिका -चीन व्यापारी युद्ध भडकण्याची शक्यता
बीजिंग – चीन सरकारने चीनमधील नागरी विमान वाहतूक कंपन्यांना अमेरिकेच्या बोईन कंपनीकडून विमाने घेण्यास मज्जाव केला असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसापासून वृत्त माध्यमात पसरले आहे. मात्र चीनच्या प्रवक्तयाने असा काही निर्णय झाला नसल्याचे नमूद केले आहे.
चीनच्या परराष्ट्र व्यवहार प्रवक्त्याने यासंदर्भात सांगितले की, चीन सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात आले आहे. मात्र मला या संदर्भात कसलीही माहिती नाही. दरम्यान चीनने बोईंग विमान खरेदी थांबवल्यानंतर आणि काही धातूची निर्यात अमेरिकेला थांबविल्यानंतर अमेरिकन सरकारने चिनी वस्तूवर 245 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अगोदर हे आयात शुल्क 145% होते. त्यानंतर चीन सरकारने इतके शुल्क आकारणे हास्यास्पद असल्याचे सांगितले होते. अमेरिकेने यानंतर आयात शुल्क वाढविल्यास चीन सरकार त्याला प्रतिसाद देणार नाही. कारण अशा आकडेवारीला काही अर्थ राहणार नाही असे सांगितले होते.
अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिका -चीनसह कोणाचेच भले होणार नाही, या भूमिकेचा प्रवक्तयाने पुनरुच्चार केला. आम्हाला व्यापारात संघर्ष नको आहे. मात्र कोणी एकतर्फी निर्णय घेत असल्यास आम्ही शांत राहणार नाही असे प्रवक्ता म्हणाला.
दरम्यान चीन सरकारने बोईंग खरेदी थांबविण्याच्या कथेत निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारचा निर्णय घेणे चुकीचे आहे असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी चिनी वस्तूवर 245 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली.
चिनी सरकार अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्यावरही मज्जा लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेतकर्यांना त्रास होईल. मात्र अमेरिका अमेरिकन शेतकर्यांना मदत करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
भारताला चीनच्या निर्णयाचा फायदा
दरम्यान चिनी कंपन्यांनी साधारणपणे 200 विमानाची ऑर्डर बोईंग कंपनीला दिलेली आहे. तर त्यापेक्षा कितीतरी जास्त विमानाची ऑर्डर भारतीय कंपन्यांनी बोईंग कंपनीला दिलेली आहे. त्यामुळे जर चीन ही विमाने घेणार नसेल तर भारतीय नागरी विमान वाहतूक कंपन्यांना ही विमाने लवकर मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर चीनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेने स्वीकारल्या नाहीत तर भारतीय वस्तू अमेरिकेला जाण्याची शक्यता वाढली आहे.
0000000
विप्रो कंपनीचा नफा वाढला 26 टक्क्यांनी
मात्र आगामी काळात महसूल कमी होण्याची शक्यता
बंगळूरु – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीने जानेवारी ते मार्च या तिसर्या तिमाईचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार कंपनीचा नफा 26 टक्क्यांनी वाढून 3,569 कोटी रुपये इतका झाला आहे. मात्र जागतिक व्यापार युद्धामुळे आगामी तिमाही मध्ये कंपनीचा महसूल कमी होऊ शकतो असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
व्यापार युद्धामुळे देशांतर्गत आणि परकीय अर्थव्यवस्थाचे स्वरूप बदलणार आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तिसर्या तिमाहीत नफा समाधानकारक पातळीवर नेण्यात आम्हाला यश मिळाले असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
अमेरिकेने आयातीबाबत धरसोड धोरण चालू ठेवले आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना निर्यात करणार्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना आपले धोरण ठरवितांना अडचणी येत आहेत. विप्रोचा बराच महसूल अमेरिकेतून येतो. मात्र अमेरिकेत मंदी निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. याचा परिणाम भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरही होत असल्याचे सांगण्यात आले.
चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल दीड टक्क्यांनीे वाढून 22,504 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहित कंपनीचा महसूल 22,208 कोटी रुपये इतका होता. सरलेल्या पूर्ण वर्षात कंपनीचा नफा 18.9 टक्क्यांनी वाढून 13,135 कोटी रुपये झाला आहे. तर महसूल 0.74 टक्क्यांनी कमी होऊन 89,088 कोटी रुपये इतका झाला आहे. या तिमाहीचा आणि वार्षिक ताळीबंद जरी समाधानकारक असला तरी कंपनीच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब म्हणजे आगामी काळामध्ये हा महसूल आणि नफा व्यापार युद्धामुळे कमी होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत कंपनी जागतीक घडामोडीकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. या तिमाहीत कंपनीच्या कर्मचार्यांची संख्या काही प्रमाणात वाढून 2,33,346 इतकी झाली आहे. कंपनीकडे सध्या 5.4 अब्ज डॉलरच्या ऑर्डर आहेत. त्यामुळे किमान दोन तिमाहीत तरी कंपनीच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होणार नाही.