सौरऊर्जा व कागद वाचविण्याचे तंत्रज्ञान वापरून पर्यावरण पूरक असा आदर्श निर्माण करणारी शाला म्हणजे औंध येथील विद्यांचल हायस्कूल. या शाळेतील विद्यार्थी डायरी, कॅलेंडर ,नोंदवह्या या ऐवजी “मायलीन” चे नावीन्यपूर्ण माहिती तंत्रज्ञान वापरत आहेत. त्यामुळे शाळेतील कागद, वेळ, पैसा या सोबतच शाळेतील शिक्षकांची कामगिरी देखील सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत झाली आहे. शाळेतील सर्व वीज ही सौरऊर्जेवर भागविली जाते त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे त्याच प्रमाणे कमीतकमी कागदाचा वापर केल्यामुळे कागदाचा खर्चही कमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे संस्थापक अशोक मुरकुटे म्हणाले की, विद्यांचल प्रशासनाने प्रथम शाळेच्या इमारतीवर सौर ऊर्जा तावदाने बसविले तसेच शाळेच्या आवारात अनेक स्वदेशी झाडांची लागवड केली. फक्त झाडे लावून पुरेसे नाही तर ही साधन संपत्ती कशाप्रकारे वापरता येईल याचा सुद्धा विचार केला पाहिजे त्याचबरोबर अपारंपारिक साधन संपत्ती पासून कसे दूर राहायचे याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा.
मायलीन या डिजिटल तंत्रज्ञानाने डायरी, कॅलेंडर, प्रगती पुस्तके, सूचना, नोंदी, हजेरी रजा नोंदी यांची जागा घेतली आहे. या डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा वर्षभराचा डेटा मिळू शकतो. हा डेटा पालकांना पाठविणे सुद्धा सोपे जाते तसेच शिक्षकांसुद्धा विद्यार्थ्यांची प्रगती एका क्लिक पाहायला मिळत आहे.
पूर्व प्राथमिकच्या समन्वयक व सिनिअर केजीच्या शिक्षिका अनिता दास म्हणाल्या की या तंत्रज्ञानामुळे शिक्षिका म्हणून आमची कार्यक्षमता वाढलेली आहे कारण प्रशासकीय कामात कमी वेळ घालवावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जास्त वेळ आम्हाला मिळतो या तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या वहीत सूचना लिहून देण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिटे घालवावी लागत होती तो वेळ आता नवीन घटक किंवा एखाद्या नवीन उपक्रमासाठी वापरू शकत आहोत.