सातारा – दुष्काळ निवारणासाठी अधिकारी रात्रंदिवस राबत असताना खा. उदयनराजेंनी केलेले आरोप म्हणजे स्टंटबाजी असून ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे, अशी टिका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली. दरम्यान, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लाचखोर अधिकाऱ्यांना मारण्याच्या विधानाचे शिवतारे यांनी समर्थन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीनंतर ना. शिवतारे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते.
राजकीय दबावापोटी सातारा जिल्ह्याच्या धरणातील पाणी सांगली जिल्ह्याला दिले जात असल्याचा आरोप खा. उदयनराजेंनी केला होता. आरोपावर प्रतिक्रिया देताना शिवतारे म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मुख्य सचिवांनी विरोधी लोकप्रतिनिधींसाठी पत्र काढले आहे. त्यामध्ये विरोधी लोकप्रतिनिधींनी आरोप करण्यापेक्षा लेखी निवेदने दिली पाहिजेत. त्याप्रमाणेच पाणी वाटपात गैरप्रकार घडले असतील तर खा. उदयनराजेंनी आरोप करण्यापेक्षा पुराव्यासहित लेखी द्यावे.
कालवा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच पाण्याचे वाटप केले गेले आहे. त्यामुळे उगाच कामे न करता स्टंटबाजी करणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लाच मागणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना चप्पलेने मारण्याच्या विधानाचे शिवतारे यांनी समर्थन केले. ते म्हणाले, भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात निंबाळकर यांना राग होता. विजय शिवतारे यांची टीका खा. रणजितसिंहाच्या विधानाचे समर्थनवाळू माफीयांवर कडक कारवाई होणार कोरेगाव व नेर ता.पुसेगाव येथे अवैध वाळू उपसा होत असताना महसूल विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक समीर शेख यांना कारवाई करावी लागली, हा मुद्दा पत्रकारांनी शिवतारे यांच्यावर निदर्शनास आणला.
त्यावर शिवतारे यांनी उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत वाळू माफीयांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे सांगितले. त्याचबरोबर कोरेगाव येथील कारवाईनंतर आरोपींना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले, हा देखील मुद्दा पत्रकारांनी निदर्शनास आणून दिला. त्यावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत जिल्हा शल्यचिकीत्सकांकडून माहिती मागवा, असे सांगितले.