नगर – कॅन्टोन्मेंट बोर्ड मार्फत रहिवाशी भागातील नागरिकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी असताना कॅन्टोन्मेंट मार्फत भिंगार येथील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा केला जातो. कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडून व प्रशासनाकडून नागरिकांना याबाबत समाधानकारक उत्त्र दिले जात नसल्यामुळे आधीच पाणी टंचाईने त्रस्त् नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व प्रशासनास योग्य त्या सूचना द्यावी अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत शून्य प्रहारात बोलताना केली. माझ्या नगर मतदारसंघामध्ये सर्वात मोठा सुरक्षा व सैनिकी दलाचा भाग भिंगार गाव परिसरामध्ये स्थित असून तेथे मोठा रहिवासी भागही आहे. अनेक वर्षांपासून तिथे असलेल्या संरक्षण विभागाद्वारे रहिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
परंतु मागील काही महिन्यांपासून ओढवलेल्या पाणी प्रश्नामुळे संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणाऱ्या रहिवाशांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, माझी सरकारला विनंती आहे की यामध्ये मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा.
नगरमधील भिंगार येथील रहिवाशी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिपत्याखाली येतात. तेथे कॅन्टोन्मेंट बोर्ड व एमआयडीसी यांच्या कराराद्वारा पाणी पुरवठा केला जातो. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डकडून पाणी गळती, जुनी पापइपलाइन इ. कारणांकडे बोट दाखवून रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. मुळात पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगली आहे.
त्यामुळे एकीकडे शहरा महानगरपालिकेकडून शहराला मुळा धरणातुन नियमित पाणीपुरवठा तर दुसरीकडे शहराचाच भाग असणाऱ्या भिंगारमध्ये पाणी-बाणी अशी अभूतपुर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या उपर स्थानिक रहिवाशांना कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून कुठलीच माहिती व्यवस्थित दिली जात नसल्याची तक्रार दिवसोंदिवस वाढत आहे.