कोणत्याही संस्थेचा “प्राण’ हा त्या संस्थेत काम करणाऱ्या माणसांवर अवलंबून असतो. जर संस्थापक उपक्रमशिल असतील तर त्यांचे साथीदार त्यांना साथ देतात आणि संस्थेत चैतन्य निर्माण होते. त्या संस्थेचा लौकिक वाढतो. समाजमनात त्या संस्थेचे कार्य रुजत जाते.
बाबासाहेब फडके हे असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व! त्यांना मुलांसाठी काम करायला आवडायचे. म्हणूनच आपली शाळा सांभाळून त्यांनी “बालविकास’ ही संस्था काढली. सोबतीला मुलांमध्ये रमणारी माणसं घेतली. संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करून घेतली. आणि संस्थेचे काम धुमधडाक्यात सुरू झाले. मुलांचे बालमेळावे, मुलांच्या सहली, गीतगायनाच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम सुरू झाले. संस्थेला देणग्याही मिळू लागल्या. मग संस्थेने मुलांसाठी मासिक सुरू केले. त्याचे नाव ठेवले “आनंदतरंग’. या मासिकात मुलांसाठी लेख, कथा, कविता, गमती-जमती, विनोद छापून येऊ लागले. मुले आतुरतेने अंक येण्याची वाट पाहू लागली. सुंदर, देखणा, रंगीत, सचित्र अंक निघू लागला.
दिवसेंदिवस संस्थेचे काम वाढू लागले. मग बाबासाहेबांनी नोकरी सोडली. ते बालविकास संस्थेच्या कामातच रममाण झाले. संस्थेला एका उद्योजकाकडून कार्यालयासाठी जागा मिळाली. त्यांची अट एकच होती की कार्यालयात त्यांच्या मातोश्रींचा कायमस्वरुपी फोटो लावावा. बाबासाहेबांनी ती अट मान्य केली.
बाबासाहेबांनी एक अभिनव उपक्रम राबविला. वेगवेगळ्या शाळांतील मुलांना सहभागी करून “एक ताल-एक सूर’ हा उपक्रम आयोजित केला. या एक ताल-एक सूर उपक्रमात दहा हजार मुलांनी प्रत्यक्ष भाग घेतला. प्रत्येक शाळेतील पन्नास मुले या उपक्रमात सहभागी झाली. देशभक्तीपर पाच गीते ही मुले एका तालासुरात म्हणणार होती. त्यासाठी संगीत शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. सहभागी शाळेमध्ये हे संगीत शिक्षक जात आणि मुलांकडून गीते म्हणवून घेत. जोडीला सुसज्ज वाद्यवृंद होता. मुलांची तयारी झाल्यावर एका प्रशस्त मैदानावर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले होते. मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले. त्यांनी गणवेशातील, ओळीत उभी असलेली, शिस्तबद्ध मुले पाहिली. आणि दहा हजार मुलांच्या मुखातून उत्स्फूर्त देशभक्तीपर गीते ऐकली. हा अभिनव उपक्रम पाहून मुख्यमंत्री दिपून केले. त्यांनी संस्थाचालकांचे कौतुक केले आणि संस्थेला दहा लाखांचा निधी जाहीर केला. मुलांना खाऊ वाटप झाले आणि एक यशस्वी कार्यक्रम पार पडला.
संस्थेचे नाव महाराष्ट्रभर झाले. पुढे संस्थेने एक नवीन उपक्रम हाती घेतला. जी व्यक्ती किंवा संस्था मुलांसाठी काम करते त्यांना प्रतिवर्षी संस्थेच्या अधिवेशनात पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार द्यायचा. एका वर्षी एका व्यक्तीला पुरस्कार दिला तर पुढच्या वर्षी संस्थेला पुरस्कार द्यायचा असे सूत्र निश्चित करण्यात आले. मग दरवर्षी महाराष्ट्रातल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती निवडून त्यांना पुरस्कार दिले जाऊ लागले. संस्थेचे अधिवेशनही महाराष्ट्राच्या विविध भागात दिमाखात संपन्न होऊ लागले. अधिवेशनाला नामांकित कवी, लेखक, कथाकथनकार, कलावंत हजेरी लावू लागले. त्यानिमित्ताने वार्षिक अंक प्रकाशित होऊ लागला.
असे सारे छान चालले होते. आणि एकेदिवशी अचानक बाबासाहेबांचे निधन झाले. साऱ्यांनाच धक्का बसला. काही दिवसांनी लोक सावरले. उर्वरित पदाधिकारी संस्थेचे काम पाहू लागले. ते त्यांच्यापरीने उपक्रम राबवत होते. मासिक अंक निघत होता. वार्षिक अधिवेशन पार पडत होते. पण हळूहळू त्यातील जोश कमी होऊ लागला. चैतन्य लोप पावू लागले. जुने पदाधिकारी मागे पडले. नवे कारभारी काम पाहू लागले. त्यातील एका पदाधिकाऱ्याने टूम काढली. ते म्हणाले, “”पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार बाहेरच्या कार्यकर्त्यांना देण्यापेक्षा आपल्याच कार्यकर्त्यांना द्यावा. ते संस्थेसाठी अहोरात्र खपतात, राबतात.” दुसरे पदाधिकारी म्हणाले, “”पण तसा ठराव करून कार्यकारिणीत तो पास करून घ्यावा लागेल.”
मग या प्रस्तावाला सर्वांनी दुजोरा दिला. आणि दरवर्षी कार्यकारिणीतील एकाला पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली. संस्था पुरस्कारासाठी हितसंबंधित संस्थेची निवड करून त्यांना पुरस्कार वाटले जाऊ लागले. वरून वरून हे सर्व भासवले जाऊ लागले. सर्व कारभार लोकशाही मार्गाने सुरू आहे असा डिंडिंम करण्यात आला. पण हे समंजसपणे वाटपसत्र आपापसात सुरू होते. “तेरी भी चूप आणि मेरी भी चूप.’
अशा या कारभारामुळे संस्थेतला आत्मा हरवू लागला. चैतन्य लोप पावू लागले. लवकरच संस्थेचे पार्थिव तेवढे शिल्लक राहिले आणि संस्थेच्या कार्यालयाला कुलूप लागले. तेव्हा बाबासाहेबांचा आत्मा अश्रू ढाळीत होता आणि बालविकास संस्था इतिहासजमा झाली होती. आनंदतरंग मासिकही बंद पडले होते आणि त्याबरोबर मुलांचा आनंदही हिरावला गेला होता.
– डॉ. दिलीप गरूड