पालघर – जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील काही गावांमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून भूकंपाचे धक्क्यांच सत्र सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आदिवासी भागातील ग्रामस्थ राहती घरे सोडण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यांची सरकारी यंत्रणांनी दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गेल्या ११ महिन्यांपासून येणारा गूढ आवाज आणि भूकंपाचे हादरे यांमुळे आदिवासी घरे सोडण्याच्या तयारीत असून सरकारी पातळीवर मात्र त्याची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत. कोणत्याही क्षणी भूकंप होईल, या भीतीने ग्रामस्थ दिवस काढत आहेत.
सरकारी यंत्रणांचे भूकंपप्रवण क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरात भूकंपमापक यंत्रे बसवून भूकंपाची कारणे शोधण्यासाठी जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, भारतीय हवामान विभाग तसेच नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजीने अभ्यास सुरू केला. मात्र त्याचीही माहिती अद्यापही उघड केली नाही.