नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज येथील मोबाइल कॉंग्रेसमध्ये 5 जी दूरसंचार सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनानंतर देशातील तेरा शहरांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. या 5 जी सेवेचा स्पीड हा 4 जी सेवेपेक्षा किमान दहा पट अधिक असणार आहे. त्यामुळे अतिवेगवान पद्धतीने देशातील नागरीकांना आता इंटरनेटसेवा व डाटा स्पीड मिळणार आहे.
5 जी सेवेबरोबरच प्रगती मैदानात सुरू झालेल्या मोबाइल कॉंग्रेसच्या सहाव्या अधिवेशनाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. यावेळी रिलायन्स जीओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना 5 जी सेवेच्या संबंधातील तांत्रिक माहिती दिली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की देशात दूरसंचार कंपन्यांनी नागरीकांना 5 जी सेवेची मोठी अलौकिक भेट दिली आहे. त्यातून देशवासियांच्या पुढे संधीचे आकाश खुले होणार आहे.
ते म्हणाले की आजचा नवीन भारत केवळ नव्या तंत्रज्ञानाचा ग्राहक बनणार नाही तर या तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान देणारा देश झाला आहे. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञान, आणि त्याच्याशी संबंधीत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारत मोठी भूमिका बजावेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. डिजीटल इंडिया हे केवळ एखादे सरकारी योजनेचे नाव नाही तर आता ती विकासाच्या योंजनेचे एक व्हिजन बनले आहे असेही मोदींनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले, अगोदर एक जीबी डेटा 300 रूपयांना पडत होता. त्यासाठी आता केवळ 10 रूपये लागणार आहे. भारतात एक माणूस महिन्याला 14 जीबी डेटा वापरतो. त्यासाठी त्याचा 4200 रूपये खर्च होत होता. तो खर्च आता 125 ते 150 रूपयेच असणार आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. डिव्हाईस, डिजिटल कनेक्टीव्हीटी, डेटाची किमत आणि डिजिटल फर्स्ट या चार डी वर सरकारने फोकस केला आहे. इंटरनेट सगळ्यांसाठी हे सरकारचे लक्ष्य असून त्यावर सरकारचे काम सुरू आहे.
आत्मनिर्भर भारत विचाराची थट्टा केली
पंतप्रधान म्हणाले की लोकांनी आत्मनिर्भर भारत या माझ्या विचाराची अनेक लोकांनी थट्टा केली. 2014 पर्यंत आपण मोबाइलची 100 टक्के आयात करत होतो. त्यात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय आम्ही घेतला. मॅन्युफॅक्चरींग युनीटस्ची संख्या आम्ही 200 पर्यंत नेली. 2014 पर्यंत ही संख्या केवळ 8 होती याकडे त्यांनी लक्ष वेधले
या शहरांना 5 जीचा मिळणार लाभ
दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनौ, गांधीनगर, जामनगर, चंडीगड, पुण आणि अहमदाबाद या 13 शहरांना 5 जीचा अगोदर लाभ मिळणार आहे.