मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 इतका कायम ठेवला असला तरी सध्याची भू-राजकीय तणावाची स्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचा जीडीपीवर नकारात्मक परिणाम पडू शकतो त्यामुळे त्या विषयी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे म्हटले आहे.
2022-23 चे तिसरे आर्थिक धोरण जाहीर करताना,आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की एप्रिल आणि मे 2022 ची उपलब्ध माहिती सूचित करते की देशांतर्गत आर्थिक वाढीचे आवेग अधिकाधिक व्यापक होत आहेत. मे महिन्यातील निर्मीती क्षेत्रातील आकडेवारी तसेच सेवा क्षेत्रात झालेली वाढ पहाता आर्थिक वाढीला चांगली संधी आहे असे संकेत मिळत आहेत.
रेल्वे मालवाहतूक आणि बंदर वाहतूक, देशांतर्गत हवाई वाहतूक, जीएसटी संकलन, स्टीलचा वापर, सिमेंट उत्पादन आणि बॅंक क्रेडिट यामधील वाढीच्या हालचाली पहाता जीडीपी आणि एकूणच आर्थिक स्थिती सुधारेल असा अंदाज आहे. पण बाह्य घटक, जसे की रशिया-युक्रेन संघर्षामुळे आणि जागतिक मंदीमुळे उदभवलेल्या स्थिती विषयी सावधगिरीही बाळगावी लागेल असेही त्यांनी सूचित केले. बॅंकेने एप्रिलच्या सुरुवातीला 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर कमी केला होता.