मुंबई – आपल्या घरामध्ये अनेकदा जुन्या मोबाईल फोनसह, बाद झालेले डीव्हीडी प्लेअर्स, सीडीज, पेनड्राईव्हज, जुने कम्प्युटर्स, बाद टेलिव्हिजनसह अनेक प्रकारचा कचरा साठलेला असतो. याला ई-कचरा म्हणतात. हा कचरा फेकायचा कुठे अथवा त्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न तुमच्यासमोर असेल, तर त्याचे उत्तर या बातमीत दिले आहे. इको रीसायकलिंग लिमिटेड, ही ई-कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी आता जगाला ई-कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट (डब्ल्युईईई) ची विल्हेवाट कशी लावायची हे दाखवून देत आहे. “बुक माय जंक’ या आपच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात आली असून मोहीम मुंबईसह पुण्यातही मूळ धरायला लागली आहे.
विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापर करणाऱ्या पर्यावरण प्रेमींना ही उपकरणे टाकून द्यायची असतील त्यांचा हा ई-कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याचे रीसायकलिंग करण्यासाठी कंपनीने “बुक माय जंक’ हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. आर्थिक लाभ मिळण्यापेक्षा पर्यावरणाला अधिक महत्त्व देणाऱ्या लक्ष्य गटाकडून या ऍपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या ई कचऱ्यात मोबाईल फोन, चार्जर, लॅपटॉप, कीबोर्ड, माऊस, टीव्ही, डेस्कटॉप, मिक्सर, ओव्हन, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशिन वगैरे सामग्रीचा समावेश असतो.
ई-कचरा निर्मितीमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक असून देशात वर्षाला 3.2 दशलक्ष मेट्रिक टन इतका ई-कचरा निर्माण होतो. त्यापैकी सुमारे 24 टक्के पश्चिम भारतात निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर बुक माय जंक हे ऍप महत्वपूर्ण ठरते. कारण लोकांच्या घरून ई-कचरा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून, त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक सामग्री निर्माण करणाऱ्या निर्मात्यांना ई-कचरा व्यवस्थापन नियम पाळण्याच्या दृष्टीने एक चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
वाढते डिजिटलायझेशन, ऑनलाईन पेमेंट, स्मार्ट सिटी प्रकल्प, तंत्रज्ञानात होणारे बदल या मुळे देशाच्या ई-कचऱ्यात वाढ होत आहे.
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारतासाठी बुक माय जंक हा पुढाकार महत्वपूर्ण ठरतो. कारण देशातील युवा तसेच कमावत्या लोकसंख्ये कडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी आहे. परंतु त्याच वेळी, या ई-कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे आणि पर्यावरण व्यवस्थेचा ऱ्हास भावी पिढ्यांना भोगावा लागेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू अयोग्य पध्दतीने फेकून दिल्यास त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात आणि त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील माती, हवा, जल आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर होतो, हे लक्षात घेता आपणही योग्य नक्कीच प्रकारे ई-कचरा घरातून हटवा