ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडवून पाठविले घरी
ओळखपत्र दाखवूनही पोलिसांचा ई-पासचा आग्रह
अग्निशमनदलाची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
पुणे – देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून शासकीय अत्यावश्यक सेवांना वगळले आहे. त्यात, महापालिकेच्या अग्निशमन दलाचाही समावेश आहे. मात्र, शहर पोलिसांकडून ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडवून पुन्हा घरी पाठविले जात आहे. तर, ओळखपत्र दाखवूनही पोलिसांचा ई-पास घेतला नाही म्हणून कर्मचाऱ्यांना अडविले जात असल्याची तक्रार पालिकेच्या अग्निशमनदलाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच, उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना वाढतात. अशा स्थितीत पोलिसांनी अडविल्याने अनेक कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचता येत नसल्याचेही या तक्रारीत नमूद केले आहे.
कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. या परिस्थितीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरविणारे नागरिक यांना कामासाठी बाहेर पडण्याची मूभा आहे. अशावेळी त्यांना शासकीय यंत्रणेकडील ओळखपत्र अनिवार्य आहे.
पुणे मनपाची अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक स्वरुपाची सेवा असून, या सेवेतील अधिकारी व कर्मचारी शहराच्या विविध भागांतून तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागांतून कामासाठी शहरात येतात. त्यांना खात्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र दाखविले असता पोलीस विभागाकडून त्यांना कामावर जाणे-येणेस सोडणे अपेक्षित आहे.
मात्र, मागील 2 ते 3 दिवसांपासून या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी ओळखपत्र दाखविले असताना देखील पोलीस विभागाकडून दिला जाणारा ई-पासचा आग्रह करण्यात येत असून प्रसंगी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सदर बाब अतिशय चुकीची व कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची, त्यांची कामावरील उपस्थिती कमी होण्याची व या सेवेवर अतिरिक्त ताण येण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.
त्यामुळे तातडीने पोलीस आयुक्तांशी चर्चा करून या कर्मचाऱ्यांना ई-पाससाठी अडविण्यात येऊ नये, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्याची विनंती या विभागाने केली आहे.