मुंबई – स्वातंत्र्यदिनी सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ऍप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाऊनलोड केले आहे.
त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे.
राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (1.19 लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (94 हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (81 हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.
ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरीवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु आहे, अशी माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.
सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई-पीक पाहणीचा 100 टक्के वापर करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ऍपच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी ऍप डाऊनलोड करून वापरावे. आपल्या पिकाचा अक्षांश रेखांशसह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावा, असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.