संचालक मंडळाच्या बैठकीत होणार चर्चा
पीएमपी तिकिट दरवाढीची शक्यता
पुणे – पीएमपी ताफ्यातील वातानुकूलित ई-बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, पुढील काळात या बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्याबाबत पीएमपीच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत.
साध्या बसेसच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे अधिक ठेवण्याच्या सरकारी नियमाचा आधार घेत ही भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 200 बसेस आहेत. यामध्ये, 1 हजारहून अधिक बसेस सीएनजीवर, तर सुमारे 800 बसेस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. यात 120 इलक्ट्रिक बसेस आहेत. तर, येत्या काही महिन्यांत आणखी 350 बसेस दाखल होणार आहेत. मागील काही महिन्यात इंधनाचे वाढते दर पाहता पीएमपीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासनाने दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो अमान्य करण्यात आला. वाढता तोटा पाहता आता प्रशासनाने ई-बसेसची तिकीट दरवाढ करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे पुढील काळात ई-बसने प्रवास करताना प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्याला विरोध होण्याचीही शक्यता असून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
सद्यस्थिती लक्षात घेता ताफ्यातील ई-बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्याची आवश्यकता आहे. याबाबत सर्वसमावेशक चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल. साध्या बसेसच्या तुलनेत वातानुकूलित बसेसचे तिकिट दर जास्त ठेवण्याबाबत शासन नियमात तरतूद आहे.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल