डिजिटल फलक पूर्णपणे कार्यान्वित नाहीत : प्रशासनाला गांभीर्य नसल्याचा आरोप
पुणे – शहरात स्मार्ट मोबिलिटीच्या अंतर्गत पीएमपीच्या ताफ्यात नव्याने 50 स्मार्ट ई-बस नुकत्याच दाखल झाल्या. मात्र, या बसच्या सुविधा अपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल फलक, वातानुकूलित यंत्रणा, हेल्पलाइन नंबर, बसची अंतर्गत ध्वनि यंत्रणा कार्यान्वित नसल्याने प्रवाशांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. यामुळे पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही प्रशासनाने ई-बस व सीएनजी बसचे उद्घाटन केल्याचे काही प्रवाशांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.
पीएमपीच्या ताफ्यात गेल्या काही दिवसांत मिडी बस दाखल झाल्या आहेत. तर, स्वातंत्रदिनी सीएनजीच्या 57 आणि ई-बस 50 दाखल झाल्या. मात्र, पहिल्याच दिवसापासून या बसेस गैरसोयीच्या ठरत आहेत. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. या बसला डिजिटल मार्गफलक आवश्यक आहे. शहरातील ई-बसला पार्किंग नसल्याने बस इतरत्र पार्किंग केल्याचे आढळून आले आहे.
या बसची किंमत कोटीच्या घरात असूनही सुरक्षेकडे कानाडोळा केला जात आहे.
स्वच्छ पर्यावरणास मदत व शून्य वायू उत्सर्जनामुळे सीएनजी व ई-बस रस्त्यावर जास्तीत-जास्त धावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या बसला वाढता प्रतिसाद मिळत आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.
ई-बस अडचणींच्या फेऱ्यात अडकली आहे. उन्हाळ्यात मिडी बसची वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाला प्रवाशांचे गांभीर्य नाही. बसच्या आवश्यक सुविधा उपलब्ध नसताना उद्घाटन केल्याने गैरसोय होत आहे.
जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच