पुणे – आगामी शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्च अखेरपर्यंत पाठ्यपुस्तकांची मागणी “ई-बालभारती’ पोर्टलवर नोंदवा, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी यांनी राज्यातील जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना बजाविले आहेत.
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासन अनुदानित शाळा यासाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा उपर्कम राबविण्यात येतो. प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रति विद्यार्थी 250 रुपये, तर उच्च प्राथमिकच्या इयत्ता सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी 400 रुपये याप्रमाणे निधीची तरतूद आहे.
दरवर्षी मागील वर्षाच्या यु-डायस डाटानुसार पाठ्यपुस्तकांची मागणी पोर्टलवर करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून त्यांचा पुरवठा मुदतीत करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे.
समग्र शिक्षाअंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकामध्ये मोफत पाठ्यपुस्तकांसाठी निधी मंजूर होण्याच्या अधीन राहून पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. मागील शैक्षणिक वर्षातील शिल्लक पुस्तके व पुन्हा वापरासाठी उपलब्ध पुस्तके मूळ मागणीतून वगळावी लागणार आहेत.
विद्यार्थी संख्येत तफावत राहण्याची शक्यता आहे. 2020-21 मधील डु-डायस प्लसमधील माध्यम व इयत्ता निहाय विद्यार्थी संख्या मागणीपेक्षा कमी असल्यास संबंधीत जिल्ह्यांना त्याप्रमाणे पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांची मागणी वेळेत न नोंदविल्यास व पुरवठा विलंबाने झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांचीच राहणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.