कोपरगाव – तालुक्यातील टाकळी परिसरातील सातचारी भागात गेल्या अनेक दिवसापांसून बिबट्याचा वावर होता. या बिबट्याचा भक्ष्याचा पाठलाग करताना बाळासाहेब काशिनाथ भोंगळे यांच्या विहिरीत पडून मृत्यू झाला. परिसरात अजून ही एक मादी व एक बछडा फिरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
अधिक माहिती अशी की, सुरेश एकनाथ मालकर हे आज दुपारी एकच्या दरम्यान भोंगळे यांच्या शेतातील विहिरीत पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याचा अंदाज घेण्यासाठी डोकावले असता, त्यांना विहिरीमध्ये मृत बिबट्या पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची महिती टाकळीचे पोलीस पाटील राजेंद्र देवकर यांना त्यांनी दिली. देवकर यांनी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना याची माहिती दिली.
त्यानंतर जाधव यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक रामकृष्ण सांगळे, संजय गोसावी, देवराम जाधव, प्रताप दवंगे, संजय गोसावी, लक्ष्मण थोरात व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने मृत बिबट्यास विहिरीतून बाहेर काढून कोपरगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे, श्रद्धा काटे यांनी उत्तरीय तपासणी करून बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात दिला. वनविभागाने त्यावर अंत्यसंस्कार केले.
वन परिक्षेत्र अधिकारी जाधव म्हणाले, विहिरीत पडलेला बिबट्या मादी जातीचा असून, त्याचे वय सहा महिने आहे. भक्ष्याचा पाठलाग रकताना तो विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे. तालुक्यातील नदीकाठच्या पट्ट्यात व बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधात बिबट्यांचा वावर तालुक्यात वाढला. याभागात बिबट्याला मुबलक पाणी, लपायला ऊस व फळबागांचे क्षेत्र, यामुळे बिबट्यांचा वावर या भागात वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांना रात्री बाहेर सोडू नये.
शेतात जाताना गळ्याला मफलर बांधून जावे. बिबट्यांपासून धोका निर्माण झाल्याने काही ठिकाणी पिंजरे लावले असून, अन्य भागात पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे, असे ही जाधव यांनी सांगितले. सुरेश मालकर म्हणाले, शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जाऊन पिकाला पाणी द्यावे लागते. या परिसरात रानडुकरे, कोल्हे, लांडगे यांचा वावर वाढल्याने त्यात बिबट्याची भर पडली आहे. तरी महावितरणने दिवसा शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने विद्युतपुरवठा करावा.