तरी सत्त्वगुणाकडे । जें दैवें भोक्ता पडे । तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया ।। 125 ।।
आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ।। 126 ।।
श्री ज्ञानेश्वरीतील सतराव्या अध्यायात ओवी क्र. 125 ते 131 यामध्ये माऊली सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या पदार्थांची गुणलक्षणे सांगतात, जेव्हा दैवयोगाने जीव सत्त्वगुणाचा बनलेला असतो, तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड असते.
जे पदार्थ स्वतःच उत्तम रसाने युक्त, जे स्वतः गोड, जे स्वतः अति स्निग्ध व पक्व झालेले असतात, जे आकाराने मोठे नसतात, हातात मऊ लागतात, जिभेवर ठेविले असता लवकर विरघळतात व स्वादिष्ट असतात, जे रसाने भरलेले असून वरून मऊ असतात व पाणीदार असून विस्तवाच्या आंचीने जागोजागी काळे झालेले असतात, श्रीगुरूंच्या मुखातील अक्षरे जरी थोडी असली तरी त्यांचा परिणाम फार थोर असतो.