माधव विद्वांस
भारत-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांची आज जयंती. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय परिवारात सोलापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सोलापूर येथेच झाले. नंतर सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, मुंबईमधून पदवी घेतली होती आणि पदव्युत्तर पदवीची तयारी करत होते त्याच वेळी वर्ष 1938 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. या चिमुकल्या राष्ट्राने त्यावेळी चीनला अक्षरशः जेरीला आणले होते.
युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्याची खूपच अडचण होती. यावेळी कम्युनिस्ट जनरल झु दे यांनी जवाहरलाल नेहरूंना काही डॉक्टर चीनकडे पाठवण्याची विनंती केली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 जून 1938 रोजी एका पत्रकार परिषदेतून लोकांना आवाहन केले आणि 22 हजार रुपयांचा निधी जमा करून स्वयंसेवक डॉक्टरांची टीम आणि एक रुग्णवाहिका पाठविण्याची व्यवस्था केली. डॉ. कोटणिसांनी तेथे जाण्यासाठी आपल्या कुटुंबाची परवानगी मागितली.
त्यावेळी कुटुंबातील बहुतेक सदस्यांना चीनबद्दल फारशी माहिती नव्हती. चीन म्हणजे फक्त रेशीम कपड्यासाठी प्रसिद्ध होता. वडील शांताराम यांनी आपल्या तरुण मुलाला परदेशी जाण्यासाठी परवानगी दिली. त्यांची आई मात्र दुःखी झाली होती. ते सप्टेंबर 1939 रोजी त्यांच्या पथकाबरोबर चीनला गेले. त्यांचे पथक प्रथम वानवानच्या हॅनकॉकोऊ बंदरात चीनमध्ये आले. त्यानंतर त्यांना क्रांतिकारक तळ “यानान’ येथे पाठवण्यात आले. जिथे माओ झेडोंग, झू दे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. कारण ते आशियाई देशातून येणारे पहिले वैद्यकीय पथक होते.
अलाहाबाद येथील डॉ. एम. अटल यांच्या नेतृत्वाखाली भारतातून चीनला जाणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात, नागपूरचे एम. चोलकर, सोलापूरचे डॉ. कोटणीस, कलकत्ता येथील देवेश मुखर्जी आणि डॉ. बी. के. बसू यांचा समावेश होता. कॅनेडियन डॉ. नॉर्मन बेथून यांच्याबरोबरच या पथकाने काम केले होते. ते चीनमध्ये 5 वर्षे राहिले. डॉ. कोटणीस भारतात आपल्या कुटुंबास वरचेवर पत्र लिहून खुशाली कळवीत असत. लढाईतील डॉक्टर म्हणून त्यांचे काम तणावपूर्ण असायचे. तिथे नेहमीच औषधाची तीव्र कमतरता होती. तीन तीन दिवस न झोपता ते शस्त्रक्रिया करीत असत. युद्धादरम्यान 800 पेक्षा जास्त जखमी सैनिकांवर त्यांनी उपचार केले. अखेरीस त्यांची चीनमधील डॉ. बेथून आंतरराष्ट्रीय पीस रुग्णालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली गेली.
यावेळी परिचारिका गुओ किंगलन त्यांच्या बरोबरच असायची. त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले व डिसेंबर 1941 मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना यिनुहा (चिनी भाषेत भारत) नावाचा मुलगाही झाला. मात्र, सततच्या परिश्रमाने ते आजारी पडले व 9 डिसेंबर रोजी त्यांचे चीनमध्येच निधन झाले.