सातारा -करोनाच्या संकटातच रक्ताचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांसाठी रक्त कमी पडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला यीेल कर्तव्य सोशल ग्रुपने मोठा प्रतिसाद दिला असून ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह 65 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
कर्तव्य सोशल ग्रुप आणि माऊली ब्लड बॅंक यांच्यावतीने छत्रपती शाहू अकॅडमी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गिरीश पेंढारकर, डॉ. रमण भट्टड, अजित कुबेर, दुर्गा माने, रामचंद्र मोरे, अमित सकटे, रफिक मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले. सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत झालेल्या शिबिरात सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह 65 जणांनी रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. ग्रुपचे सदस्य प्रकाश नाईक यांनी यावेळी फेसशिल्डचे मोफत वाटप केले.
आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना आजच्या धावपळीच्या युगात कमी होत चालली आहे.
करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती होती. रक्ताच्या तुटवड्यामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा होत नाही आणि रक्त नाही म्हणून रुग्णांना प्राण गमवावा लागणे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रक्तदान केले पाहिजे. आपले रक्त कोणाचा तरी प्राण वाचवणारे असते. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे मत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.
अडचणीच्या काळात रक्तदान करुन प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहकार्य करणाऱ्या रक्तदात्यांचे सौ. वेदांतिकाराजे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपचे विलास कासार, विजय देशमुख, चंदन घोडके, दीपक भोसले, दिलावर पत्रेवाले, जितेंद्र मोहिते, रवी पवार, राजा महाडीक, प्रकाश नाईक, चंद्रकांत बेबले, महेश यादव, संदीप भणगे, निशिकांत पिसाळ, सौ. सुजाता घोरपडे, सुनील भोसले, राहुल धनावडे तसेच सह्याद्री प्रतिष्ठान, सारथी सामाजिक सेवा संस्था यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.