शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील जागृत देवस्थान श्री दत्तगुरुंचा मागील ५० वर्षांपासून अखंडितपणे सुरु असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व जयंती उत्सवास शुक्रवार (दि.६) रोजी सुरुवात होत आहे.
सकाळी गावातून भागवत पताका उंचावत, विठू नामाचा गजर करीत ग्रंथराज, कलश, विना यांचा भाविक, वारकऱ्यांनी टाळ मृदूंगाच्या साथीत व ढाकी वस्ती प्राथमिक शाळेतील बालचमूची आकर्षक नवनाथ वेशभूषा, स्वामी समर्थ, दत्तगुरु, बालकांच्या रूपातील भगव्या पताका उंचावणारे विद्यार्थी, दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असंख्य नागरिक, महिला, भाविक यांच्या सुमधुर भजनाने भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा झाला. सप्ताहास सुरुवात झाली.
यावेळी डॉ. सुभाष पोकळे, राजेंद्र चाटे, बाळासाहेब डांगे, फक्कडराव सांडभोर, अर्जुन मुखेकर, सोपान वागदरे महाराज, जयवंत भाईक, मृदूंग वादक सुरेश महाराज बोऱ्हाडे, प्रताप पाटील इचके, बबन पोळ, बबुशा कांदळकर पाटील व भक्तगण सोहळ्यात श्रद्धेने सहभागी झाले होते.
सप्ताह कालावधीत भाविक भक्तांच्या उपस्थितीत वीणाप्रहार, नियमित हरिपाठ, काकडा भजन होणार आहे. भाविकांना अन्नदान देखील करण्यात येणार आहे.
सप्ताहचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. (दि.१५) पर्यंत सप्ताहकाळात रात्री सात ते नऊ कालावधीत कीर्तन सेवेचे आयोजन केले आहे. रविवार (दि.१५) रोजी श्री दत्त जयंती अखंड हरीनाम सप्ताह सांगता निमित्ताने सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या वेळेत ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे, पुणे यांचे काल्याचे कीर्तन, महाप्रसाद व त्यानंतर गावातून दिंडी प्रदक्षिणाने सप्तांहाची सांगता होणार असल्याची माहिती श्री दत्त जयंती सप्ताह व उत्सव समिती यांनी दिली आहे.