सुरेश डुबल
-कराड- चिपळूण रस्त्याची अवस्था
-प्रवाशांच्या जीवाशी खेळ
-वाहनधारक वैतागले
कराड – गेले वर्षभरापासून कराड-चिपळूण महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे.बऱ्याच ठिकाणी एकावेळी दोन्ही बाजूच्या लेनची खुदाई केली आहे.यापूर्वी ही हा रस्ता राज्यमार्ग असताना निकृष्ट व संथ गतीने केला होता.त्यावेळी ही प्रवाश्यांना या रस्त्याने प्रवास करताना प्रचंड प्रमाणात त्रास झाला होता.मात्र रस्त्याचा दर्जा बदलला पण समस्या त्याच आहेत.
कराड -चिपळूण महामार्गाचे काम ज्या पध्दतीने सुरू आहे यावरून ठेकेदार कंपनीने त्या मार्गावरून प्रवास करणारे वाहनधाकर, प्रवाशी यांच्या जीवाशी खेळ सुरू केल्याचे दिसून येत आहे. रस्ता करताना कोणतीच खबरदारी न घेता आणि संपूर्ण रस्ताच उकरून ठेवल्याने वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत.अपघातामुळे अनेकजण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम बंद पाडण्याच्या मानसिकतेत संतप्त वाहनधारक आहेत.
वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू आहे. तरी या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम मुळ ठेकेदाराने पोट ठेकेदारांना दिल्याची चर्चा सुरूआहे. त्यामुळे त्या- त्या ठेकेदारांनी आपल्या मर्जीप्रमाणे कामे सुरू केली आहेत. कोणी रस्ता उकरून ठेवला आहे. कोणी अर्धवट अवस्थेतील काम तसेच ठेवले आहे. तर काहींचे काम कासवगतीने सुरू आहे. पोट ठेकेदारांना पोसण्यासाठी वाहनधारकांना वेठीस धरले गेले आहे. नियोजनशुन्य कामकाज सुरू आहे. कोणते काम प्राधान्याने पूर्ण करायचे, वाहनधारक, प्रवाशांची कमीत कमी गैरसोय कशी होईल याकडे लक्ष पुरविणे गरजेचे होते. पण तसे काहीच होताना दिसत नाही. खोदलेले रस्ते, ठिकठिकाणचे खड्डे, रस्त्याच्या कामाचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, कमलीचा धुरळा अशा बिकट परिस्थितीत वाहनधारक वर्षभरापासून प्रवास करत आहेत. त्यांनी हाडं खिळखिळी होण्याची वेळ आली आहे.
एकूण कामांपैकी पन्नास टक्केही काम सुरू झाले नाही. जे सुरू आहे ते देखील केवळ रस्ता उकरून ठेवण्यापर्यंतच मर्यादित असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दैनंदिन अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रचंड हाल वाहनधारकांचे सुरू आहेत. काम सुरू असताना रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने प्रचंड प्रमाणात धुरळा उडत आहे. लहानमुले, वृध्द यांना प्रवासादरम्यान हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रोज तक्रारी होत असताना आणि प्रवाशी वाहनधारकांची ओरड सुरू असताना प्रशासन या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित ठेकेदारांना काहीच सूचना करत नाहीत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कराड – चिपळूण रस्ता गेले वर्षभर झाला तर काम सुरूच आहे.रस्ता अस्ताव्यस्त व कोठेही उकरल्याने छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. या रस्त्यावर ठेकेदाराकडून कसल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. पाणी न फवारल्यामूळे प्रचंड धूळ उडत असून या धुळीचा त्रास ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे.या सततच्या त्रासामुळे ये रस्त्यावरून ये जा करणेही नकोस वाटते.
नीलेश फल्ले, प्रवासी.