होणार, होणार म्हणून अगोदरपासून गाजत असलेले दोन मेळावे मुंबईत पार पडले आणि कुठेही शांततेला गालबोट लागले नाही, हे विशेष. वास्तविक महाराष्ट्रात एकूण चार दसरा मेळावे झाले आणि त्यापैकी नागपूर येथे आपल्या विजयादशमी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, “लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण हवे’, असे मत व्यक्त केले.
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलेच पाहिजे; परंतु भारतात हे धोरण गेली काही वर्षे उत्तम प्रकारे राबवले जात असून, अल्पसंख्य समाजही त्यास प्रतिसाद देत असल्याचे आकडेवारी सांगते. बीड येथील मेळाव्यात, “माझे काय चुकले? मंत्री म्हणून चांगले काम केले. राज्यभर फिरून पक्षासाठी काम केले नाही का?’, असा थेट सवाल विचारून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद नेहमीप्रमाणे व्यक्त केली. मात्र त्याचवेळी, समर्थकांनी आपापल्या भागात जाऊन 2024च्या निवडणुकीच्या तयारीला लागावे व समर्पणाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आपण नाराज असलो, तरी पक्षातून बाहेर पडणार नाही, याचे संकेतही त्यांनी दिले. मात्र, या चारपैकी दोन दसरा मेळाव्यांबद्दल लोकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले होते.
आपल्यामागे सर्वाधिक खासदार व आमदार असल्याचे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. परंतु सर्वसामान्य शिवसैनिक आपल्यामागे असल्याचा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. त्यामुळे कोणाच्या मेळाव्यास जास्त गर्दी असेल, याविषयी स्पर्धा निर्माण झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी येथे शिंदे यांनी भरवलेल्या सभेस 95 हजार, तर ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील सभेस 70 हजार लोक जमले होते. जास्त गर्दी जमवण्यात शिंदे यांना यश मिळाले असले, तरी आज राज्यात सरकार त्यांचे आहे. तसेच महाशक्तीचे त्यांना वरदान मिळालेले आहे. बीकेसीवरील गर्दी मोठ्या प्रमाणात जमवण्यात आली होती, या आरोपात तथ्य आहे, असे मानायला जागा आहे. याचे कारण, वेगवेगळ्या चॅनेल्सवर जेव्हा मुंबईकडे निघालेल्या “शिंदे समर्थकां’च्या मुलाखती घेण्यात आल्या, तेव्हा सभा कोणाची, ती कशासाठी आहे आणि त्यात भाषणे कोणाची होणार आहेत, याचा बऱ्याच लोकांना पत्ताच नसल्याचे दिसून आले. बीकेसीवरील सभेसाठी प्रवास, कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची सोय याकरिता प्रचंड पैसा खर्च करण्यात आला. मोठ्या प्रमाणात एसटीच्या गाड्या बुक करण्यात आल्यामुळे, सामान्य प्रवाशांची गैरसोय झाली आणि त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण काय, असा सवाल विचारून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले.
बीकेसीवरील सभेत दहा लाख लोक येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील, मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरचे आणखी काही आमदार व खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, अशाही पुड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु तसे काही घडले नाही. ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर आपले भाषण सुरू करण्याची चलाखी शिंदे यांनी दाखवली. शिवतीर्थावरील सभेत ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करून दाखवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. कॉंग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून आम्ही हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजप व शिंदे गटाकडून सातत्याने केली जात आहे, परंतु तुमचे हिंदुत्व हे शेंडीजानव्याशी जोडले आहे, तर आमचे हिंदुत्व हे देशाशी जोडले आहे, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते, त्यावेळी भाजपचे हिंदुत्व कुठे गेले होते? सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत गेलेले चालतात, अडवाणींनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर माथे टेकवले किंवा मोदी यांनी नवाज शरीफांच्या वाढदिवसाला जाऊन केक कापला, त्यात भाजपला काही वावगे वाटत नाही, असे वार उद्धव यांनी सभेत करून, हिंदुत्वाबाबत आपण मात्र कोणतीही तडजोड करणार नसल्याचे अधोरेखित केले. बेरोजगारी, विषमता यावरून संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केलेल्या विधानांबाबत उद्धवजींनी त्यांचे अभिनंदन केले.
मोदी आणि भाजप सरकारला त्यांनी आरसा दाखवला आणि गाईपेक्षा महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असेही उद्धवजींनी ठणकावले. देशात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अमित शहा यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करून, देशात हुकूमशाहीचा धोका असल्याचे प्रतिपादनही उद्धवजींनी केले. एकूण उद्धवजींच्या संपूर्ण भाषणात देशातील महत्त्वाच्या विषयांचा ऊहापोह होता. तसेच गद्दारांचा उल्लेख, बाप चोरणारी अवलाद, या शब्दांत त्यांनी वार केला. याउलट, एकनाथ शिंदे यांच्या भाषणात देश व राज्यासमोरील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक समस्यांचा फारसा उल्लेख नव्हता. त्यांनी भाषण जवळपास वाचूनच दाखवले आणि सरकारी निर्णयांची माहितीही ते कंटाळवाण्या पद्धतीने वाचून दाखवत होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण खूप लांबले व त्यामुळे अनेक लोक कंटाळून भाषण अर्धवट सोडूनच निघून जात होते. गद्दार आणि खोके, यावरून सातत्याने हिणवले जात असल्याची शिंदे यांची भळभळती जखमही बाहेर आली. जनमताचा कौल डावलून कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा उद्धव यांचा निर्णय म्हणजे जनतेच्या मताशी गद्दारीच होती, असा युक्तिवाद करून, त्यांनी बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या संपत्तीचे वारसदार असलात, तरी त्यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, असे प्रत्युत्तरही शिंदे यांनी दिले.
शिंदे यांच्या संपूर्ण भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोदी व शहा यांचा उदोउदो करण्यात आला. आनंद दिघे यांचे पाय कापणारे आणि त्यांचे निधन झाल्यावर त्यांची संपत्ती किती व कोणाच्या नावे होती, याचा तपशील विचारणारे उद्धवच होते, असे सांगून शिंदे यांनी बॉंबगोळाच टाकला. अर्थात यासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिला नसल्यामुळे कोणतीही खळबळ माजली नाही. वास्तविक दिघे हयात असेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच सर्वेसर्वा होते. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्याचे अधिकार उद्धवजींना तेव्हा कितपत होते, हा प्रश्नच आहे. शिंदे यांनी आपल्या मेळाव्यास स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे, निहार ठाकरे प्रभृतींना आमंत्रित करून, ठाकरे घराण्यातील काही व्यक्ती आपल्यासोबत असल्याचे दाखवून राजकारणास भावनिक डूब देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. असो. मुंबईतील या दोन सभांमध्ये वारंवार त्याच त्याच मुद्द्यांचा पुनरुच्चार झाला असून, त्या विषयांचाही आता लोकांना कंटाळा आला आहे. या आरोप-प्रत्यारोपांची मजा दूर राहून भाजप घेत आहे. परंतु यापुढील काळात शिंदे सरकारकडून गतिमान कारभाराची आणि उद्धवजींच्या शिवसेनेकडून प्रभावी विरोधी पक्षाची कामगिरी अपेक्षित आहे.