मुंबई – राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात दररोज धक्कादायक घडामोडी सुरू आहे. त्यातच राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने आता कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे, असा सवाल कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी करत विरोध केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र, आता कॉंग्रेसने या निवडणुकीवरच आक्षेप घेतला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी राज्यपालांनी 15 मार्च रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत निवडणुकीस मनाई केली होती.
मग, आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी काय घेतली जात आहे आणि कोणत्या नियमांतर्गत निवडणूक होत आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी तातडीने बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का घेतली असा प्रश्नही त्यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधानसभा सदस्यांनी हात उंचावून करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्याने दाद मागितली. सुप्रीम कोर्टात असलेल्या प्रलंबित प्रकरणामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे आता सत्तांतर झाल्यानंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी जाहीर झाली, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.