दौंड -दौंड पोलिसांनी शहरातील कुरकुंभ मोरी वाहतुकीसाठी बंद केली आहे. सध्या करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दौंड शहरात नागरिकांची वर्दळ पाहता ही संचारबंदी मोडीत निघाल्याचे दित आहे. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेऊन कार्यवाही केली.
कुरकुंभ मोरीमुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. ती कुरकुंभ मोरी वाहतुकीसाठी बंद केली आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेटस् लावले आहेत. त्यामुळे लोक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.
शहरातील मोठे व नामवंत हॉस्पिटल्स् हे कुरकुंभ मोरीच्या पलीकडे नव्याने वाढलेल्या दौंड भागात आहेत. मूळ दौंड अलीकडील भागात वसलेले आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकास काही त्रास झाला तर त्याला चांगल्या रुग्णालयात जाण्यासाठी ही मोरी बंद झाल्याने वळसा घालून जावे लागणार आहे.
पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्य असला तरी अत्यावश्यक असणाऱ्या नागरिकांनी कसे जायचे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जे विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई केल्यास फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल. मात्र, पोलिसांनी तसे न करता थेट वाहतुकीचा रस्ताच बंद करून टाकला आहे.
जुने आणि नवीन गावठाणातील त्रांगडे
काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती या जुन्या गावठाणात राहायला आहेत. त्यांचे व्यवसाय हे नवीन गावठाणात आहेत. तसेच काहीजण नवीन गावठाणात राहायला आहेत. त्यांचे व्यवसाय हे जुन्या गावठाणात आहेत. त्यामुळे अशा लोकांना ये- जा करण्यासाठी त्रास होणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाही पेट्रोल दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोलचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे एका व्यावसायिकाने सांगितले.