शहरात 826 सोसायट्यांमध्ये भाजीपाल्याची विक्री
शेतकरी कंपन्यांच्या पुढाकारातून उपक्रम
पुणे – लॉकडाऊन काळात शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच सडत आहे. यातून मार्ग काढत अनेक शेतकरी कंपन्यांकडून या मंदीतही भाजीपाला व माल विक्रीची संधी शोधली आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना घरपोच ताजा भाजीपाला मिळत असून, शेतकऱ्यांनादेखील चांगले उत्पन्न मिळत आहे.
लॉकडाऊनमुळे नाशवंत शेतमालासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने पुण्यातील बाजारपेठा, किरकोळ विक्रीची दुकाने बंद आहेत. दुसरीकडे काढणीस आलेला माल शेतातच फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शहरातील लोकांना शेतमालाचा तुटवडा भासत होता. यातूनच इंदापूर येथील पीएच फार्मर प्रोड्युसर कंपनीने तालुक्यातील वडापुरी, रामवाडी, वरकुटे परिसरातील शेतकऱ्यांकडून दर्जेदार भाजीपाला खरेदी करण्यास सुरुवात केली. 25 मार्चपासून हा भाजीपाला पॅकिंगद्वारे शहरातील सोसायट्यांना आठवडाभर पुरेल एवढ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जात आहे. मागणीनुसार फळे, गहू, ज्वारीचे पीठ, ज्वारीपासून तयार केलेले उपपदार्थदेखील उपलब्ध करून देण्यात येतात.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने भाजीपाला खरेदी, विक्री करताना पुरेशी काळजी घेतली जाते. भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून रोख पैसे स्वीकारले जात नाहीत, तर गुगल पे किंवा फोन पेसारख्या ऑनलाइन सेवांद्वारे व्यवहार केले जातात. ही सर्व रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना मालाचे पैसे दिले जातात. पॅकेजिंग, वाहतुकीचा खर्च वजा शिल्लक राहिलेला नफा सभासदांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीनेच जमा केला जातो.
शेतात पीकणारा भाजीपाला वाया जाण्यापेक्षा कंपनीच्या माध्यमातून शहरातील सोसायट्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला. यातून औंध, बाणेर, मांजरी, हडपसर, मगरपट्टा यासह पुणे शहर परिसरातील 826 सोसायट्यांनी मागणी नोंदविली. एकाच वेळी 25 किंवा त्यापेक्षा अधिक पॅकिंग घेणाऱ्या 45 सोसायट्यांना भाजीपाला पुरविण्याचा निर्णय घेतला. यातून लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. अनेक शेतकरी कंपन्या या मार्गाचा अवलंब करून चांगले उत्पन्न घेत आहेत.