मुंबई – महाराष्ट्रात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. त्यामुळे सर्वत्र हाहाकार होता. या कालावधीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य खात्याची धुरा अत्यंत काळजीपूर्वक सांभाळली. त्यांच्या या कार्याचं कौतुक होत आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील टोपे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
‘सन्मान देवदूतांचा’ हा विशेष कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात कोरोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. यावेळी आठवले बोलत होते.
करोना काळात आरोग्यमंत्री टोपेंनी उत्तम काम केलं. घरच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेतली. विरोधक असलेल्या भाजपनेही करोना काळात टोपेंवर कधी टीका केली नाही, असंही ते म्हणाले.
‘करोनाच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरुन उरले राजेश टोपे…’ अशा पद्धतीने कवितेतून आठवले यांनी आरोग्यमंत्र्यांचं कौतुक केलं. आरोग्यमंत्री म्हणून टोपेंनी खूप उत्तम काम केल्याचे आठवलेंनी नमूद केलं.