नवी दिल्ली : देशात डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आर्थिक बाबींसंदर्भात निर्णय घेतले जात नव्हते, तसेच आर्थिक घडामोडीदेखील ठप्प झाल्या होत्या, असे मोठे विधान आयटी क्षेत्रातील दिग्गद आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केले आहे. मनमोहन सिंग यांचे व्यक्तीमत्व असामान्य आहे, मात्र, तरीही त्यांच्या काळात आर्थिक विकास रखडला, असल्याचे मत मूर्ती यांनी व्यक्त केले आहे.
अहमदाबादमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मूर्ती यांनी यूपीए काळातील भारताच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी मत व्यक्त केले. भारतातील युवा पिढीच्या जोरावर भारत दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा स्पर्धेक बनू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांचा मी खूप आदर करतो. मात्र, त्यांच्या नेतृत्वातील यूपीएच्या काळात निर्णय घेतले जात नव्हते आणि त्यामुळे सर्वच गोष्टी रखडत गेल्या. दुर्देवाने हे असे का घडले मला माहित नाही”, असे मूर्ती यांनी म्हटले आहे.
“२००८ ते २०१२ या कालावधीत मी लंडनमधील एचएसबीसी बोर्डावर होतो. पहिल्या काही वर्षांमध्ये बैठकांमध्ये जेव्हा चीनच्या नावाचा उल्लेख दोन ते तीनदा यायचा, तेव्हा भारताचे नाव केवळ एकदा घेतले जायचे. २०१२ साली एचएसबीसी सोडताना भारताचा क्वचितच उल्लेख व्हायचा, त्यावेळी चीनचे नाव जवळपास ३० वेळा बैठकांमध्ये घेतले जायचे”, असे मूर्ती यांनी यावेळी सांगितले.