पिंपरी – स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहराच्या विविध भागात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित ठेकेदाराने शहरातील दीडशे किलोमीटर रस्त्याची खोदाई केली आहे. मात्र काम झाल्यावर खोदलेला रस्ता पूर्ववत केलेला नाही. यामुळे खोदलेल्या ठिकाणी आधी डांबरीकरण करा, मगच पुढील कामाला परवानगी देऊ, अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे.
शहरात घडलेल्या कोणत्याही घटनेची माहिती महापालिका व पोलीस प्रशासनाला व्हावी, यासाठी शहरात आगामी काळात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हीच्या कनेक्टीव्हिटीसाठी रस्ते खोदून त्यात केबल टाकण्यात येत आहे. ठेकेदाराकडून केबल टाकण्याचे काम जोरदार सुरू आहे. मात्र खोदलेल्या ठिकाणचे काम पूर्ण झाल्यावर त्यावर डांबरीकरण करण्यात येत नाही. यामुळे खड्ड्यातील माती रस्त्यावर येते. मातीमुळे दुचाकी घसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्त्याचे डांबरीकरण करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे.
मात्र महिनाभरानंतरही ठेकेदार खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करीत नसल्याच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. सहा दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदारास आधी खोदलेल्या 150 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करा, मगच पुढील खोदकाम करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
संबंधित ठेकेदाराने शहरात तब्बल 150 किमी रस्ते खोदून त्यांची दुर्दशा करुन ठेवली आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर नागरिक त्रस्त आहेत आणि आपला रोष लोकप्रतिनिधी व प्रशासनावर व्यक्त करत आहेत. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठेकेदारांकडून केली जात असलेली टाळाटाळ पाहता आयुक्तांनी कडक पवित्रा घेत स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराचे काम थांबविले आहे.
चिंचवडगाव येथील तानाजीनगर, काकडे पार्क परिसरातील रस्ते गेल्या महिनाभरापूर्वी सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी खोदले आहेत. याबाबत नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. तसेच आयुक्तांच्या कानावरही ही बाब घातली. येथील रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही बसविण्याचे काम एल ऍन्ड टी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने शहरातील विविध भागात दीडशे किलोमीटर रस्ता खोदून केबल टाकली आहे. मात्र रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. यामुळे प्रथम रस्ते पूर्ववत करा, मगच पुढील काम करा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
– लक्ष्मीकांत कोल्हे, उपअभियंता-पिं.चिं.मनपा