पिके वाचविण्यासाठी थोड्याशा पाण्यासाठी शेतकऱ्यांचा कोट्यवधिचा खर्च
दुष्काळाचा निवडणुकीवर होणार परिणाम
नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्याच्या मुळा परिसरामध्ये दुष्काळाचे चित्र सध्या भयाण आहे. अशाही परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी दुष्काळ निवारणासाठी व शेतात जळालेली पिके पाहून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी साधा प्रयत्नही केला नाही.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अकोले – बेसुमार झालेला वाळूचा उपसा, बेभरवशाचा पाऊस व लघु पाटबंधारे विभागाचे चुकीचे पाण्याचे नियोजन, यामुळे धरण असूनही मुळा नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पिके वाचवण्यासाठी थोड्याशा पाण्यासाठी शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा खर्च होत आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांना गेल्या महिनाभरापासून तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्याचा, शेतात उभ्या असलेल्या पिकांचा प्रश्न सध्या मुळा परिसरातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून थोड्याशा पाण्यासाठी मुळा नदीपात्रात फायरिंग मारणे, विहिरीतील गाळ उपसणे, विहिरींची खोली वाढवणे, बोअर मारणे यासाठी दुष्काळी परिस्थितीतही कोट्यवधींचा खर्च गेल्या दोन महिन्यांपासून झाला आहे. त्यामुळे शेतकरी दुष्काळासोबतच आर्थिक विवंचनेतही सापडला आहे.
अकोले तालुक्यातील मुळा परिसरामध्ये 1972 नंतर अनेक लघुपाटबंधाऱ्यांची निर्मिती झाली होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी पाण्याच्याबाबत बऱ्याच अंशी समाधानी झाला होता. त्यातच नव्यानेच मुळा नदीवर साकारलेले पिंपळगाव खांड धरण तर शेतीसाठी संजीवनीच ठरावे, अशी परिस्थिती होती. मात्र यावर्षी झालेले अपुरे पर्जन्यमान, जलसंपदाकडून मुळा नदीवरील अडवलेल्या पाण्याचे पूर्णतः चुकलेले नियोजन याचबरोबर मुळा नदीपात्रातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला बेसुमार वाळूउपसा व याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष या सर्व कारणांमुळे यावर्षी मुळा परिसरातील सर्व गावांमध्ये ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे.
मुळा नदीपात्र तर गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडले आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. गावोगावच्या ग्रामपंचायतीही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाणीपुरवठा करत आहेत. काही गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून बऱ्याच ग्रामपंचायतींची पाण्याचे टॅंकर्स सुरू करण्याची मागणी आहे. परिसरातील भूगर्भाची पाणी पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे.त्यामुळे बोअरवेलने माना टाकल्या आहेत. ते सपशेल फेल ठरत असून, विहिरीही आटल्या आहेत. कधी नव्हे ती एवढी भीषण पाण्याची परिस्थिती परिसरामध्ये निर्माण झाली आहे.
वाढलेले तापमान व पावसाचे रोहिणी नक्षत्र संपत चालले तरी वातावरणात न दिसणारे बदल बळीराजाची डोकेदुखी आणखी वाढवीत आहे. मान्सून अजून जर लांबणीवर गेला, तर यावर्षी दुष्काळाचे याहीपेक्षा भयाण रूप शेतकरी उध्वस्त केल्यावाचून राहणार नाही. यावर तत्काळ उपाययोजना करुन प्रशासनाने पशुधन जगविण्यासाठी त्यांना चारा व मुबलक पाणी मिळावे. जळालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी.गावोगाव पाहणी करून गरज असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स चालू करावेत, अशी मागणी चास गावचे सरपंच बाळासाहेब शेळके, किशोर कोकाटे यांनी केली आहे.