मुंबई: कृषी सहाय्यक हा राज्य शासन आणि शेतकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांनी शासनाच्या योजना, कृषिविषयक सल्ला आणि मार्गदर्शन आदी बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात त्याचा ग्रामस्थ, शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल. कृषी सहाय्यकांनी मिशन म्हणून काम केले पाहिजे. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील २२ हजार गावात जलसंधारणाची मोठी कामे झाल्यामुळे यंदाच्या दुष्काळाची तीव्रता कमी झाली, असे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
कृषी क्षेत्रात झालेली गुंतवणूक
जलयुक्त शिवार अभियान 8 हजार 900 कोटी रुपये; जलसिंचन प्रकल्पात 34हजार कोटी रुपये; मागेल त्याला शेततळे योजनेत 539 कोटी रुपये; एकात्मिक पाणलोट कार्यक्रमासाठी 1 हजार 105 कोटी रुपये; सूक्ष्म सिंचन अभियानासाठी2 हजार 719 कोटी रुपये; एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी 648कोटी रुपये; शेतकरी कर्जमाफीसाठी 18 हजार 457 कोटी रुपये; नैसर्गिक आपत्ती आर्थिक मदतीसाठी 14 हजार 125 कोटी रुपये; कृषि यांत्रिकीकरणासाठी883 कोटी रुपये; अनुदानित बियाणे वितरण कार्यक्रमासाठी 204 कोटी रुपये;किमान आधारभूत किमती आधारित शासकीय खरेदीसाठी 8 हजार 336 कोटी रुपये; राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 2 हजार 897 कोटी रुपये; पीक विमा योजना नुकसान भरपाईसाठी 16 हजार 778 कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली आहे.
दरम्यान, त्याआधी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. राज्यात मागेल त्याला शेततळे व अन्य योजनांमध्ये एक लाख 61 हजार शेततळे तयार करण्यात आली आहेत. राज्यात 1 लाख 73 हजार विहिरी बांधण्यात आल्या आहेत. 2017-18 आणि 19 या द्वितीय सायकल मध्ये राज्यातील 1 कोटी 18 लाख 47 हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करण्यात आली, त्यामुळे सुमारे 11 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील 26 कृषी उत्पादनांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाले आहे,पंतप्रधान पीक विम्याचे राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना विमा कवच देण्यात आले असून 51 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले. राज्यात 34हजार कांदाचाळी बांधण्यात आल्या आहेत. यावर्षी कांदा चाळीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात मार्च अखेर 42 लाख 18 हजार कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात प्रथमच कापसाच्या सरळ वाणात महाबीज मार्फत बीटी वाण आणण्याचा प्रयोग करण्यात आला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.