मुंबई – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राज्यातील सध्याच्या घडामोडींवरून विधीमंडळात गोंधळ पाहायला मिळत आहे. राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि वीजबील यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज मुख्यमंत्री भाऊ उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र ते भेट न घेताच माघारी परतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच राज ठाकरे माघारी परतल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र भेट न होण्याचं कारण आता समोर आलं आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही निमयांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी करोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. कोरोना चाचणी केलेली नसल्यास विधान भवनात प्रवेश दिला जात नाही.
दरम्यान राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी विधानभवनाच्या आवारात दाखल झाले होते. मात्र त्यांच्याकडे करोना चाचणीचा अहवाल नव्हता. त्यामुळे ते भेट न घेताच माघारी परतल्याचे सांगण्यात येत आहे.