नागरिकातून उमटताहेत तीव्र प्रतिक्रिया; अधिकाऱ्यांचा एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न
पाटणला मग्रुर अधिकारी…
पाटण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला बेजबाबदार अधिकारी भेटल्याने पाण्याची गंभीर समस्या तालुक्यात निर्माण झाली आहे. टंचाईच्या काळात अधिकाऱ्यांनी गावातील पाणीटंचाईकडे लक्ष देण्याऐवजी टक्केवारीत लक्ष घातल्याने पाणीटंचाईच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. कंत्राटदाराला बाहेर गाठून हॉटेलवर नेऊन त्याच्याकडून वाटणी घेण्याचे उद्योग पाणीपुरवठा विभागातील मोठा अधिकारी करत आहे. दुसऱ्या कोणालाही हा उपअभियंता जुमानत नसल्याने त्याच्या मग्रुरपणाचा कळस झाल्याची चर्चा पाटण पंचायत समितीत ऐकायला मिळत आहे.
सूर्यकांत पाटणकर
पाटण – पाटण तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र प्रत्येकवेळी जाणवणाऱ्या पाणीटंचाईला अधिकारीच जबाबदार असून पाणी पुरवठा विभागात झालेल्या भ्रष्टाचारामुळे पाणीयोजना पूर्ण झाल्या नाहीत. परिणामी जनतेला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. पाटण तालुक्यात पाणी टंचाईची निर्माण झालेली परिस्थिती कृत्रिम नसून मानवनिर्मित असल्याचे समोर आले आहे. स्वजलधारा यशवंत ग्रामसमृद्धी तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना अशा विविध योजना तालुक्यात राबविण्यात आल्या. मात्र या शासकीय योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने या योजनांची मुदत संपूनही त्या रखडल्या आहेत.
पंचायत समितीच्या पाण्याच्या योजनांसाठी ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करण्यात आल्या. सरपंच प्रमुख आसणाऱ्या या समित्यांना पाणी पुरवठा योजनांवर खर्च करण्याचा अधिकार देण्यात आला. पाणी पुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने जुजबी प्लॅन इस्टीमेट तयार करून त्याचे टेंडर काढून जवळच्या राजकीय कंत्राटदाराला योजनांची खिरापत वाटली. वाढीव इस्टीमेट तयार करून पाच लाखाच्या खर्चाच्या पाणी योजनांसाठी शासनाकडून वाढीव इस्टीमेट तयार करून दहा लाख रुपयांची मागणी करून गावात पाणीयोजना मंजूर केली जाते. मात्र वाढीव निधी डायरेक्ट सरपंच, शाखा अभियंता व भ्रष्ट कारभाराचा सूत्रधार असणारा उपअभियंता यांच्या खिशात जातो.
वाढीव प्लॅन इस्टीमेटचा डायरेक्ट निधी खिशात गेल्यानंतर राहणाऱ्या पन्नास टक्के निधीला इमाने इतबारे कात्री लावण्याचे कंत्राटदार वरद हस्ताखाली करत असतो. त्यामुळे जेवढा भ्रष्ट कारभार करता येईल. तेवढा करून उर्वरित कामासाठी निधी संपल्याचे फर्मान साहेबांकडून काढले जाते. पुन्हा संबंधित पाणी योजनांचे काम बंद पडते.
कोयना विभागातील मणेरी, पाटण विभागातील बोंद्री, केर, घाणबी, वाटोळे, म्हावशी, मणदूरे या गावांमध्ये अशाप्रकारचा भ्रष्टाचार पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. मात्र एकावरही या योजनांमध्ये कारवाई झाली नाही.
तालुक्यातील कोयना नदी काठची गावे वगळल्यास डोंगरी गावे वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. पाळीव गुरा-ढोरांनाही एक वेळ पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून हा प्रश्न आहे. झरे कडक उष्णतेने आटले आहेत तर नद्यांचे पात्रही पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीपात्रात ओढ्याच्या काठाला खड्डे पाडून पाण्याचा शोध लोकांकडून घेतला जात आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. मोरगिरी, ढेबेवाडी, कोयना, तारळे विभागातील गावांत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा जनतेला सोसाव्या लागत आहेत.