वाघापूर – पुरंदर तालुक्यातील खरीप हंगामातील सर्वात प्रसिद्ध आणि केवळ दीड महिन्यास तोडणीस येणारे वाटाणा पीक यावर्षी अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण यावर्षी जास्त पाऊस झाला असून या आठवड्यात तब्बल पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ रिपरिप सुरू होती. त्यामुळे जमिनीत पाणी साचून कित्येक ठिकाणी पिके जळून गेली आहेत. तर अनेक ठिकाणी वाटाण्याच्या मुळ्या कुजल्याने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला वाटाणा हातातून जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे.
येथील हवामान वाटाणा पिकास पोषक असून गोड चवीमुळे संपूर्ण राज्यात या पिकाला पुरंदरचा वाटाणा म्हणून जास्त मागणी असते. विशेष म्हणजे पेरणीनंतर केवळ दीड ते दोन महिन्यांत तोडणीस येत असून बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना पैसेही चांगले मिळतात. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतो. तसे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे.
पुरंदर तालुक्यामधील दिवे, सोनोरी, वनपुरी, पारगाव, माळशिरस, पोंढे, चांबळी, गराडे, बोपगाव, कोडीत त्याचप्रमाणे राजुरी, नायगाव, टेकवडी, पारगाव, एखतपूर, आणि जेजुरीच्या परिसरात घरटी शेतकऱ्यांनी वाटाण्याचे उत्पादन घेतले आहे. पीक चांगले आले असताना काही ठिकाणी तोडणी सुरू आहे. तर काही ठिकाणी फुलोऱ्यात असतानाच शेतातील पाण्यामुळे पीक पिवळे पडले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
वास्तविक पाहता नाशिक, नगर आणि सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील पिकाला मोठा भाव मिळेल ही अपेक्षा होती, परंतु या तालुक्यातही सलग पावसामुळे वाटाणा पीक नष्ट झाले आहे.
फळ उत्पादकांना आर्थिक फटका
वाटाणा या केवळ एका पिकावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्याचबरोबर सीताफळ, डाळिंब ही फळपिके सुद्धा आहेत, परंतु बाजारभाव पडल्याने फळे उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत.