पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू होणार तिसऱ्या टप्प्यातील काम
पुणे – टेमघर धरणाच्या भिंतीची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम पावसाळ्यामुळे थांबविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्तीचे तिसऱ्या टप्प्यातील काम पुन्हा हाती घेतले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी टेमघर हे एक धरण आहे. टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. त्याची एकूण क्षमता पावणेचार टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 वर्षांत त्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदा सर्वांत आधी टेमघर धरणातील पाणी पिण्यासाठी खडकवासला धरणात सोडले. धरण रिकामे झाल्यानंतर दुरुस्तीच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामास वेग आला.
टेमघर धरण दुरुस्तीचे काम मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. धरण दुरुस्तीच्या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रीलींग व ग्राऊटींग या पद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशाच्या कोनात ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडले जाते. यानंतर या छिद्रामध्ये सिमेंट, सिलीका, फ्लॅशसोबतच दोन द्रवस्वरुपातील पदार्थ असे एकूण सहा पदार्थ्यांचे मिश्रण प्रेशरच्या सहाय्याने सोडले जाते. यामुळे गळती थांबण्यास मदत होते. धरण दुरुस्तीचा हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्याच्या कामामुळे धरणातील गळती रोखण्यास यश आल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम उन्हाळ्यापासून सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे. आता पावसाळा असल्याकारणामुळे मागील दहा दिवसांपासून दुरुस्तीचे काम थांबविले आहे. पावसाळा संपताच पुन्हा हे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.