खटाव- माणला पावसाची प्रतीक्षा; खरीप हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती
प्रशांत जाधव
सातारा – जूून महिना अर्धा संपला तरी अद्यापही खटाव- माण तालुक्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. आज- उद्या पाऊस येईल या आशेने आकाशाकडे डोळे लावणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. पावसाच्या भरवशावर खरिपाच्या पिकांसाठी शेतीची मशागत करून शेत तयार ठेवणाऱ्या शेतकऱ्याला त्याच शेताच्या कडेला बसून वरुणराजाला साकडे घालण्याशिवाय सध्या तरी कोणताच पर्याय उरल्याचे दिसत नाही.
कायम दुष्काळी असे बिरूद कपाळी लागलेल्या खटाव- माण तालुक्यातील शेतकऱ्याला शेतात पाणी खळाळणार असल्याचे आभासी जग दाखवण्यात आले.
यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेल आनंद फार काळ टिकला नाही. पाणी आले म्हणून आनंदी झालेल्या शेतकऱ्यांना आज पावसाअभावी खरिपाचा पेर वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागात मुख्यत: बाजरी पिकाला शेतकरी प्राधान्य देतात. त्याव्यतिरिक्त मूग, उडीद, भुईमूग या कडधान्यासह खरीप हंगामाची पिके घेण्यासाठी शेतात मशागत करून शेते पेरणी योग्य केली. मात्र, जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने नेमकी कोणती पिके घ्यावीत, बियाणे कोणते खरेदी करावे, हंगाम वाया तर जाणार नाही ना, अशा चिंतेत शेतकरी आहेत.
मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्याने या हंगामाचे भविष्य काय, या चिंतेत शेतकरी आहे. पेरण्या लांबणीवर पडल्याने कृषी केंद्रामध्येही शुकशुकाट आहे. खटाव माण तालुक्यात शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत असतात. खटाव- माण तालुक्यात खरिप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाच्या आगमनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची सर्व कामे वेळेत आटोपली. मात्र, जून महिन्यातील तब्बल दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळेच तहानलेल्या भूमीसह शेतकरीही पावसाची वाट पाहत आहे.
पाण्यासाठी लढाई करायची का?
आमच्या भागात पावसाचे प्रमाण लय कमी हायं. त्यामुळं आम्हाला टेंभू, उरमोडी, जिहे कठापूर या योजनाचं पाणी मागचं मिळायला पाहिजे हुतं. मात्र, तसे काहीच झालं नायं, आमच्या शेजारणं कॅनालच पाणी खळाळताना आमच्या डोळ्यात पाणी येतं साहेब! त्यामुळं करतू बघतू, असे म्हणून नेत्यांनी अजून आमचा अंत बघायला नको. नायतर आमच्या लेकराबाळांना परमुलखात चाकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. इतकं भयाण वास्तव असतानाही कुणालाच काय पडलं नसलं तर पाण्याचा खेळ
मिटवायसाठी आम्ही काय लढाई करायची का?
सोमनाथ सुर्वे, शेतकरी.
बाजारपेठेवर परिणाम
यंदा जून संपला तरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी बाजारपेठेत फिरकलाच नाही. परिणामी खत खरेदीला येणारा शेतकरी याच काळात शाळा सुरू होत असल्याने शालेय गणवेश, पाठ्यपुस्तकांची खरेदी करत असतो. मात्र यंदा तसे न झाल्याने बाजारपेठेच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.
चंद्रकांत येलमर, खतविक्रेते.