नगर – गेल्या 529 वर्षांत नगर शहराने अनेक दुष्काळ पाहिले. सुरुवातीच्या काळात 30-40 वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळाचे सातत्य नंतरच्या काळात झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. 14 व्या शतकापासूनचा इतिहास पाहता आज 21 व्या शतकापर्यंत दुष्काळाचे सातत्य सरासरी दर तीन वर्षांपर्यत वाढलेले दिसतंय. म्हणजेचे नेमेची येतो पावसाळा म्हणण्या ऐवजी दर तीन वर्षांनी येतो दुष्काळ, असे म्हणावेसे वाटते. सातत्याने येणाऱ्या दुष्काळाची तीव्रताही वाढलेली दिसते. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना मात्र करता आलेली नाही. म्हणजेच दुष्काळ नगरच्या पाचवीलाच पूजलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नगरच्या इतिहासातील सर्वांत मोठा दुष्काळ म्हणजे 1396 साली पडलेला आणि 12 वर्षांपर्यंत मुक्कामी राहिलेला दुर्गा देवीचा दुष्काळ. 12 वर्षांच्या याकाळात थेंब भर देखील पाऊस पडला नाही की दाणाभर धान्य उगवले नाही. आख्खी गावंच्यागावं देशोधडीला लागली. त्यानंतरचा मोठा दुष्काळ म्हणजे 1460 सालचा दामाजीपंताचा दुष्काळ नावाने प्रसिद्ध आहे. यावेळी अन्नाचं दुर्भिक्ष भासल्याने दामाजीपंत हे मंगळवेढ्याचे मुलकी अधिकारी असतांना दुष्काळग्ररस्त लोकांकडून सरकारी कोठार लुटविल्याचा आरोप त्यांच्यावर लागल्याने या दुष्काळास दामाजीपंतांचा दुष्काळ म्हटलं जातं. पुढे 1520 आणि 1629-30 सालात पुन्हा मोठ्या दुष्काळाला जिल्ह्याला सामोरे जावे लागले.
सन 1790 ते 1794 या पाच वर्षात जिल्ह्यातील अकोला, जामखेड, पारनेर, संगमनेर याठिकाणी कॉलराची साथ उदभवली आणि आपत्तीत भर पडली. सन 1802 मध्येपुन्हा तीव्र दुष्काळाला सामोरंजाव लागलं. मात्र यावेळचा दुष्काळ सुलतानी होता. त्यावर्षी पिके चांगली आली असली, तरी यशवंतराव होळकर आणि शिंदे पेशव्यांच्या सैन्याने संपूर्ण मुलुख उद्ध्वस्त केल्याने आणि त्यात पेंढारी लोकांच्या टोळ्यांची भरपडल्याने जिल्ह्यातील लोकांवर अक्षरशः चिंचेचा पाला खावून गुजराण करण्याची वेळ आली होती.
या नंतरच्या काळात पडलेल्या दुष्काळांमध्ये जनरल वेलस्लीच्या काळात लोकांना मदत म्हणून जुने नळ वगैरे दुरूस्तीची कामे देण्यात आली. जनावरांसाठीही मदत करण्यात आली. मात्र ती अत्यंत तुटपुंजी ठरली. यापुढील काळात म्हणजे 1832-33, 1845-46आणि 1862 सालच्या दुष्काळात मात्र सरकारने जिल्हातील ठिकठिकाणी रस्ते तयार करणे, त्याकरिता खडी तयार करणे, दौंड -मनमाड रेल्वेलाईनचा भराव टाकणे, ओझर कॅनॉलची 10 मैल खोदाई करणे ही कामे दुष्काळग्रस्तांकडून करून घेतली.
1872 साली सर्व प्रथम दुष्काळ निवारण समिती अस्तित्वात आली. त्याकाळी शहरातील धनाढ्यांकडून काही देणग्या गोळा करण्यात आल्या. त्यातून कापूरवाडी नळ योजनेचे तसेच माळीवाडा, सर्जेपुरारोड, तोफखाना, नेप्तीगेट रोड दुरूस्त करण्यात आला. लोकांना धान्य वाटण्यासाठी म्युनिसिपॅलिटीला आगाऊ रक्कम देण्यात आली. त्यापैशातून नागपूर, परभणी येथून धान्य आणून लोकांना वाटण्यात आले. सॅनिटरी कमिशनरच्या रिपोर्ट नुसार अन्नछत्रे तयार करण्यात आली. तेथे महिला, मुलांना सकाळ, सायंकाळचे जेवण दिले जायचे. 1897 साली नगरमध्ये पुअर हाऊस बांधण्यासाठी तत्कालिन सरकारकडे 30 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मागण्यात आले.
मात्र सरकारने त्याला ठाम नकार दिला. पुन्हा सन 1899 मध्ये दुष्काळात जुन्या नळातील गाळ काढण्याचे काम लोकांना मिळाले त्यापोटी लोकांना खर्चही मिळाला. 1916 मधल्या दुष्काळातही शेतकऱ्यांना गवत, कडबा, मोट करता कर्ज देण्यात आले, तर गरिबांना मोफत मदत देण्यात आली. पुढे 1945-46 च्या दुष्काळात प्रथमच जिल्ह्यात ठिकठिकाणी जनावरांसाठी छावण्या काढण्यात आल्या. त्यावेळी नवलमल फिरोदिया आणि एन. एन सथ्था यांनी सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. पुढे 1952 – 54 च्या दुष्काळात मोतीलाल फिरोदियांनी दुष्काळाशी दोन हात करतांना प्रशंसनीय कार्य केले. या दुष्काळात रामकृष्ण मिशन च्या वतीने गोरगरिबांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले.