सोरतापवाडी -पूर्व हवेलीतील अनेक गावांत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याची चिंता वाढली आहे. भिवरी, वाडेबोल्हाई, कोरेगावमूळ, कोलवडी, म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर गावात मागील काही महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. पुन्हा बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देणे जिकीरीचे झाले आहे.
दि. 1 डिसेंबर 2018 रोजी रामदरा शेजारील वस्तीवर रोहित हाके या तरुणाच्या चार शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. त्याआधी म्हातोबाची आळंदी येथे रामोशवाडी येथील डोंगराशेजारी बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली होती. डिसेंबरला भिवरी वाडेबोल्हाई गावालगतच बिबट्या दिसला होता.
दि. 7 जानेवारी रोजी उरुळी कांचन, कोरेगाव मूळ सीमेवर बिबट्याने शेळी खाल्याची माहिती पोलीस पाटील वर्षा कड यांनी दिली होती. दि. 8 जानेवारी रोजी कोलवडी मांजरी रस्त्यावर अभिनव शाळेजवळ माने यांच्याघराजवळ बिबट्या दिसला होता.
दि. 10 जानेवारीला आळंदी येथे बिबट्याची पिल्ले आढळली तर 11 तारखेला रामदरा येथे बिबट्याचे ठसे आढळले.त्यामुळे बिबट्याने पूर्व हवेलीत ठाण मांडले आहे. बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे. त्यातच नायगाव, पेठ, कोरेगावमूळ गावात रात्रीची विहिरीवरील वीज असल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी भीती वाटत आहे.
याबाबतीत महावितरणने दखल घेऊन रात्रभर वीज न देता रात्रीऐवजी दिवसा सहा तास वीज द्यावी, अशी मागणी रघुनाथ चौधरी, दत्तात्रय चौधरी, राजेंद्र चौधरी, कल्पनाताई चौधरी, गणेश चौधरी, युवराज चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
बिबट्यांमुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अजूनपर्यंत वनविभागाकडून बिबट्याची दखल घेतली नाही. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पसिरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
– माऊली माथेफोड, शेतकरी, म्हातोबाची आळंदी.