सातारा – समर्थ रामदास स्वामी यांच्या नावाने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी 2014 साली राष्ट्रवादीचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात साताऱ्यात कविता सादर करून त्यांना पाडण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी साडेतीन लाख मताधिक्य उदयनराजेंना मिळाले. यावेळी आठवलेंच्या कवितेमुळे उदयनराजेंच्या समर्थकांना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांपैकी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे देशपातळीवरील नेते आहेत. सेना-भाजप युती व्हावी याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. त्याला यश मिळाले, पण त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला एकही उमेदवारी मिळाली नाही. तरीही तळागाळातील नेता म्हणून अनेकजण त्यांच्याशी मैत्री करतात. राज ठाकरेंपासून ते खा. उदयनराजेंपर्यंत त्यांचे मैत्रीचे धागे आजही अतुट आहेत.
2014 साली आरपीआयचे एकही पंचायत समिती सदस्य नसाताना सातारा लोकसभा मतदार संघाची सेनेकडून जागा मागून घेतली. त्यावेळी आरपीआय व महायुतीचे उमेदवार अशोक गायकवाड यांच्या प्रचारावेळी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत, मी अशोक गायकवाडला सांगतो….खा. उदयनराजेंना पाडा… अशी चारोळी म्हणत उपस्थितीत पत्रकारांना हसवून टाकले. पण त्या निवडणुकीत अशोक गायकवाड यांना 71 हजार 808 मते मिळाली होती. ते चार नंबरवर फेकले गेले होते. त्यावेळी 18 उमेदवार रिंगणात होते.
यंदाच्या होऊ घातलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीतही सातार्यात प्रचारासाठी दुपारी साडेतीनच्या पत्रकार परीषदेला खा. आठवले हे साडेपाच वाजता म्हणजे तब्बल अडीच तास उशिरा आले. तरीही काही पत्रकार बातमी मिळेल या आशेने थांबले होते. त्यावेळी मंत्री आठवले यांनी उदयनराजेंच्या “कॉलर’ उडविण्याबाबत आपण काय कविता करणार? या प्रश्नाला त्यांनी…”पवारसाहेबांनी ज्यांची कॉलर ओढली…ती सीट आम्ही पाडली’ अशी चारोळी सांगत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना पाठींबा असल्याचे सांगितले. यावेळी सदरचे वृत्त प्रसिध्द होताच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. गेल्यावेळी त्यांच्यावर रामदास आठवलेंनी अशी चारोळी केली होती. त्या चारोळी वेगळा अर्थ मतदारांनी काढला आहे.