श्रीकांत कात्रे
महिला बचत गटाची चळवळ महिलांना स्वावलंबी होण्यासाठी खूप उपयुक्त ठरली. त्यातही काही गटांनी नवीन काही करण्याचा ध्यास घेऊन गटातील सर्व सभासदांची आर्थिक उन्नती साधली. सुषमा ज्ञानेश्वर भागीत यांच्या नेतृत्त्वाखालील महिला गटानेही वेगळा उद्योग निवडून प्रगतीची दिशा अवलंबिली. माणदेशी फाउंडशेनकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे या गटाला उद्योग- व्यवसाय सुरू करण्यापासून मार्केटिंगच्या तंत्रापर्यंत बरेच काही शिकता आले. या शिक्षणाचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय वाढविला. आणि पुढील काळात आणखी विस्तार करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत…
पनवेल परिसरातील अजिवली गावातील महिला एकत्र आल्या. काही तरी करण्याची उमेद त्या बाळगून होत्या. त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. महिला बचत गटाचे माध्यम त्यांनी निवडले. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रत्येकीची धडपड होती. सुषमा भागीत यांनी या सर्व महिलांच्या प्रयत्नाला दिशा दिली. प्रत्येक महिलेच्या गाठीला दोन पैसे असतील, असे काही करायचे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. महिला स्वावलंबी होतील अशा पद्धतीचा काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या पर्याय शोधत होत्या. माणदेशी फाउंडेशनशी त्यांचा संपर्क आला. फाउंडेशनकडून विविध प्रकारची माहिती मिळाली.
वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाविषयी माहिती समजल्यावर माणसांच्या रोज लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे रोजच्या गरजेच्या स्वच्छतेसंदर्भातील म्हणजेच वॉशिंग पावडर, हॅंन्डवॉश, डिटर्जंट, फ्लोअर क्लिनर, डिशवॉश अशा प्रकारचे सॉलिड व लिक्विड उत्पादन घेण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरले. पण हा उद्योग करायचा कसा हाही प्रश्न होता. पण माणदेशी फाउंडेशनकडूनच प्रश्न मार्गी लागला. महिलांना या उद्योगाचे प्रशिक्षण माणदेशीकडूनच मिळाले.
कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करण्याची आणि पुढे मार्केटिंगपर्यंतची सारी माहिती मिळाली. आता पुन्हा प्रश्न होता भांडवलाचा. पण या गटातील 15 महिलांची जिद्द मोठी होती. प्रत्येकीने पैसे उभे केले. काहींनी कर्ज घेतले. एका छोट्या रुममध्ये काम सुरू झाले. मुंबई, भिवंडी येथून कच्चा माल आणायचा. प्रक्रिया करायची. उत्पादन सुरू झाले. विक्री सुरू झाली. सुरवातीलाच 50 हजारांची उलाढाल झाली. महिलांचा हुरूप वाढला. संकल्प महिला उद्योग गट या नावाचा हळूहळू व्यवसायात जम बसू लागला.
आता या उत्पादनांना डी मार्टकडूनही मागणी आली आहे. हा प्रवास आता चांगला दिसू लागला आहे. पण त्यामागचे कष्ट, मेहनत खूप आहे. महिलांनी चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले. अनेक छोट्यामोठ्या अडचणी समोर येत होत्या. त्यातून मार्ग काढला जायचा. पॅंकिंगची मशीन आणि वजन काटा याखेरीज इतर सामुग्री काही नाही. मशिनरी नसल्यामुळे सर्व महिला हातानेच सारी प्रक्रिया करून उत्पादन घेतात. कच्च्या मालापैकी केमिकल्स आणि मीठ मोठ्या प्रमाणावर आणावे लागते. त्याचे योग्य प्रमाण घेतले तर उत्पादन दर्जेदार होते, असे सुषमा भागीत सांगत होत्या. त्याशिवाय वेगवेगळे रंग, विविध फ्लेवरचे सेन्टस् याचा उपयोग करावा लागतो.
उद्योग वाढू लागला. त्यासाठी माणदेशीने खूप सहकार्य केले. महिलांना उत्पादन तयार करण्याच्या प्रशिक्षणापासून मार्केटिंगमधील छोटी छोटी तंत्रे शिकवली. बॅनर्स काढली. व्हॉटस ऍप व सोशल मीडियावरून उत्पादनाची माहिती लोकापर्यंत पोहचविण्याचे कसब शिकविले. या उत्पादनात नावजलेल्या कंपन्यांची स्पर्धा मोठी आहे.
तरीही आपण दर्जेदार उत्पादन घेऊन आपला ब्रॅंन्ड तयार करायचा या जिद्दीने काम सुरू ठेवले. परिसरातील बाजारपेठच महत्त्वाची होती. पण दुकानदारांचा प्रतिसाद कमी होता. सोशल मीडियावरून आणि सरकारी दवाखाने, अंगणवाडी सेविका, आशा सेविका अशा महिलांच्या समूहाला भेटून त्यांच्या बैठकांमधून उत्पादनांची माहिती देऊन स्वतंत्र बाजारपेठ त्या मिळवित गेल्या. महिलांनी तयार केलेले उत्पादन म्हणून चांगला प्रतिसाद मिळू लागला. इतर कोणतेही पाणी न वापरता उत्पादनाचा दर्जा राखण्यासाठी मिनरल वॉटर वापरावे लागते.
हे लक्षात घेऊन आपले उत्पादन उत्तमच व दर्जेदार असेल यासाठी काळजी घेतली जाते. पाणी, केमिकल्स व इतर घटकांचे योग्य प्रमाण झाले नाही तर उत्पादन वाया जाते, त्यामुळे उत्पादन दर्जेदार असेल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते, असे त्यांनी सागितले. या उद्योगामुळे आज या महिलांना रोजगार उपलब्ध झाला, ही खूप महत्त्वाची बाब असल्याचे सुषमा भागीत यांनी सांगितले. यापुढील काळात हा उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढवायचा आहे. त्यासाठी काही मशिनरी घ्यायची आहे. बाजारपेठ विस्तारित करायची आहे. महिलांची जिद्द मोठी आहे. संघर्ष करण्याची तयारी आहे.
आर्थिक स्वालंबी होण्याची उर्मी प्रत्येकीच्या मनात आहे, त्यामुळेच भविष्यात एक चांगला ब्रॅंन्ड तयार करायचा असल्याचे भागीत यांनी स्पष्ट केले. समाजात कशाची गरज आहे, हे ओळखून तशा पद्धतीचे उत्पादन घेण्याचा विचार महिला करतात, ही गोष्ट खूपच महत्त्वाचीआहे. आणि त्यापुढेही जाऊन व्यवसाय यशस्वी करण्याची चिकाटी दाखवतात. हाच महिलाशक्तीचा प्रत्यय या महिलांनी सिद्ध करून दाखवला आहे. एकजूट राखत अशा वेगळ्या उद्योगात यश मिळविण्याचे हे प्रयत्न सर्वांनीच लक्षात घेण्यासारखे आहेत.