– संतोष वळसे पाटील
गेल्या चार-पाच वर्षांपासून सरासरी पाऊस पडण्याचे प्रमाण घटत चालले आहे. वृक्षतोड होत असताना ती रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. वृक्षलागवड करताना अधिकारी आणि कर्मचारी केवळ फोटो सेशनपुरते वृक्ष लागवड करतात, परंतु त्यांचे संवर्धन करण्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने दुष्काळाचे स्वरुप दिवसोंदिवस उग्र होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
पर्यावरणाचा समतोल ढासळला असून वाढते औद्योगिकरण, कमी होणारी जंगले, वाढते शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड तसेच चारचाकी वाहनांचा वाढता वापर या सर्व गोष्टी उष्णता वाढीला व दुष्काळाला कारणीभूत आहेत. श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलांची कत्तल सुरू आहे. झाडांची होणारी तोड याकडे लक्ष देणारी वनखात्याची यंत्रणाच कुचकामी ठरली आहे. अनेक वेळा नागरिकांच्या तक्रारीकडे वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी लक्ष देत नाहीत. वृक्षांची झालेली तोड उष्णता वाढीस व कमी पावसास कारणीभूत आहे. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन केले नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आंबेगाव तालुक्याचे वाळवंट होईल, असा इशारा पर्यावरण तज्ञांनी दिला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून याकडे कोणाचे लक्ष नाही. वनविभाग हा वनाच्छादित क्षेत्र सोडून बाकीच्या खासगी क्षेत्रात होणाऱ्या वृक्षतोडीकडे डोळेझाक करीत आहे. झाडे तोडायला ग्रामसभेची परवानगीही घेतली जात नाही. त्यामुळे ज्या नागरिकांच्या क्षेत्रात झाड आहे. ते निर्धास्तपणे ते तोडून नष्ट करतात. त्यामुळे वृक्षांची झपाट्याने घट झाली आहे. शेताच्या बांधावर असणाऱ्या झाडांची मोठी कत्तल झाली आहे. पर्यायाने पर्यावरणाची मोठी हानी झाली. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन करणे गरजेचे बनले आहे.अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये वारंवार दुष्काळ पडेल. पावसाचे प्रमाणही कमी होईल व पाण्यासाठी संघर्ष होईल. पूर्वी मोठे झाडे पहायला मिळायची, परंतु गाव, चौकात असणारी ही झाडे तोडून त्या ठिकाणी सभामंडप, व्यापारी गाळे, इमारती बांधण्यात आल्या.