धोकादायक पोल व लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा; कराड दक्षिणमधील परिस्थिती
कराड – महावितरणाच्या कारभारामुळे दक्षिणेमधील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. शिवारात वाकलेले विजेचे पोल, लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा यामुळे भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या या कारभारामुळे कालेतील एका महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून किती जीव घेतल्यावर महावितरणचे डोळे उघडणार? असा खरमरीत सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत.
जुने मालखेड, बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यानजीक असणारा धोकादायक विजेच्या पोल सह कराड दक्षिणमधील शिवारातही अशीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी झाली आहे. शिवारातील पोल वाकल्यामुळे वीजवाहक तारा शेतातूनच लोंबकळत आहेत. शेतकरी वर्ग सध्या आपल्या कामात मग्न असल्याने त्यांना या वीजवाहक तारांचा कधी स्पर्श होईल हे सांगता येत नाही. तसेच वाकलेले पोल कोसळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
याबाबत वीजवितरण कंपनीने दखल घेऊन असे धोकादायक विजेचे पोल सुस्थितीत उभा करण्याची मागणी जुने मालखेड, बेलवडे बु, कासार शिंरबे यासह परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. राष्ट्रीय महामार्गापासून जुने मालखेड, बेलवडे बु, कासार शिंरबे या गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यालगत राष्ट्रीय महामार्गानजीक हाकेच्या अंतरावर असणारा विजेचा पोल धोकादायक अवस्थेत उभा आहे.
या परिसरात जुने मालखेड, बेलवडे बु, कासार शिंरबे ही गावे असल्याने या रस्त्यावर सतत वाहनधारकांची ये-जा या मुख्य रस्त्यावर असते. तसेच मालखेड येथील अनेक शालेय विद्यार्थी बेलवडे बु. येथे शालेय शिक्षणासाठी याच मार्गाने ये-जा करीत असतात. यासह शेतामध्ये देखील असे वाकलेले खांब पहावयास मिळत आहेत. शिवाय पावसाळा सुरू झाल्याने या परिसरात शेतीची मशागतीची कामे सुरू असल्याने शेतात लोकांची वर्दळ सुरू आहे. या परिसरात पाऊस व वारा असल्यामुळे असे धोकादायक विजेचे पोल कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे याबाबत वीजवितरण कंपनीने त्वरित दखल घेऊन परिसरातील असे धोकादायक विजेचे पोल सुस्थितीत उभे करून लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे. अन्यथा महावितरणच्या या अशा कारभारामुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जातोय नाहक बळी
काले येथील गडकरी शिवारात दहा जुलै रोजी शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या उषा यादव या विद्युत तारेला चिकटून जागेवर ठार झाल्या होत्या. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे महिलेचा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. गडकरी शिवारात विद्युत पुरवठा खंडित असल्याची तक्रार महावितरणच्या काले कार्यालयात या विभागातील शेतकऱ्यांनी केली होती. पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने हा अनर्थ घडला, अशी स्थिती शिवारात आहे. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून महावितरणने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.