नवी दिल्ली – देशातील पायाभूत क्षेत्रातील 470 मोठ्या प्रकल्पांला झालेल्या विलंबांमुळे या प्रकल्पांचा खर्च अतोनात वाढला असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च आता 4 लाख 37 हजार कोटींवर गेला आहे.
देशात पायाभूत सुविधा क्षेत्रातील एकूण 1718 प्रकल्पांचे काम सुरू आहे. या साऱ्या प्रकल्पांचा सुरूवातीचा एकूण खर्च 21 लाख 99 हजार 181 कोटी रूपये इतका होता. आता हे प्रकल्प जेव्हा पुर्ण होतील त्यावेळी त्यांच्यावरील एकूण खर्च 26 लाख 36 हजार 710 कोटी रूपये इतका झालेला असेल. म्हणजेच विलंबामुळे या प्रकल्पांवरील खर्च 4 लाख 37 हजार 528 कोटी रूपये इतका वाढणार आहे.
ही रक्कम मुळ खर्चाच्या 19.90 टक्के इतकी अधिक आहे. या साऱ्या प्रकल्पांवर आत्तापर्यंत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत 12 लाख 52 हजार 298 इतका खर्च झाला आहे. विलंब झालेल्या 560 मोठ्या प्रकल्पांचा विचार केला तर यातील 96 प्रकल्पांना एक ते बारा महिने इतका विलंब झाला आहे.
134 प्रकल्पांना 13 ते 24 महिन्यांचा, 210 प्रकल्पांना 25 ते 60 महिन्यांचा, 126 प्रकल्पांना 61 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा उशिर झाला आहे. या एकूण प्रकल्पांचा सरासरी विलंब हा सुमारे 47 महिन्यांचा आहे.