कर्जत – मोकाट जनावरांच्या त्रासाने राशिन ग्रामस्थ, प्रवासी तसेच बाजारकरू त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्ते तसेच राज्यमार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरांच्या अडथळ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना त्रास होत आहे.
ग्रामपंचायतीकडून मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कसलाच ठोस निर्णय घेतला जात नाही. ग्रामस्थांची ओरड होऊनही त्याची दखल घेतली जात नाही हे विशेष. या प्रश्नावर आंदोलनेही झाली, मात्र तात्पुरत्या उपाययोजना करून या प्रश्नाला बगल देण्यात येत असल्याने ग्रामस्थ प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.
जनावरे शहरात ठिकठिकाणी ठिय्या देत असून अडथळ्यामुळे अनेकदा वाहतुकीचीही कोंडी होते. त्याचा वाहन चालकांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. राशिन शहरात अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांचा त्रास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी युवक क्रांती दलाच्या वतीने या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने जुजबी कारवाई केली. मोकाट जनावरांच्या मालकांना फक्त नोटीस बजावण्यात आल्या. कारवाईच्या भीतीने काही दिवस जनावरे कमी झाली.
राशिन येथील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतकडून जनावरांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था करणे, जनावरांची गणना करून मालकांना नोटिसा देणे, संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची मदत घेणे अशा अंमलबजावणीची गरज आहे. मात्र त्याची कार्यवाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून केल्याचे दिसत नाही.
सार्वजनिक ठिकाणी गाय, बैल तसेच वासरांचाही मोठा वावर आहे. ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रारी होतात, मात्र मोकाट जनावरांवर ठोस कारवाई केली जात नाही. मंगळवारी आठवडे बाजारात घुसून विक्रीला मांडलेल्या भाज्या जनावरे फस्त करतात. त्याचा मोठा भुर्दंड विक्रेत्यांना बसत आहे. बाजार करण्यासाठी आलेल्या जनावरांचा महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. वळूच्या धडकेने जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत. महात्मा फुले चौक, भिगवण, करमाळा तसेच सिद्धटेक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे मोकाट जनावरांचा कळप असतो.त्यामुळे चालकांना मोठी कसरत करून वाट काढावी लागते.
मोकाट जनावरांच्या त्रासाने ग्रामस्थ वैतागले आहेत. या प्रश्नावर युवक क्रांती दलाच्या वतीने राशीन ग्रामपंचायतीला निवेदन दिले होते. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नाही. आठवडे बाजारासाठी पंचक्रोशीतील विक्रेते तसेच बाजारकरू येथे येतात. मात्र मोकाट जनावरांमुळे पालेभाज्या, फळभाज्या विक्रेते, महिला, वृध्द यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विक्रेत्यांच्या मालाची जनावरे नासाडी करतात. तक्रारीची दखल न घेता ग्रामपंचायतीकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून जनावराच्या मालकांची पाठराखण होत असल्याचे दिसून येत आहे.
विनोद सोनवणे युवक क्रांती दल, राशिन