पुणे : कोरोना व्हायरसनं पुणेकरांच्या मनात भीतीचं सावट असलं तरी पुणेकर अनावश्यक प्रवास टाळत या संकटाला धैर्याने सामोरे जात आहेत. मात्र परगावातून आलेले आणि पुण्यात राहणाऱ्या नागरिकांनी मात्र गड्या आपला गाव बरा म्हणत काढता पाय घेण्यास सुरवात केली आहे.
पुणे जिल्ह्यात कामानिमित्त येणऱ्यांची संख्या आता रोडावली असून पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. दस्तूरखुद्द विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसभरात सुमारे 35हजार असायची. पण आता ती रोडावलीय.
दिवसभरात आता 26 हजार प्रवाशी पुण्यातून प्रवास करतात. त्यात येणारे आठ हजार आहेत. तर जाणारे तब्बल 18 हजार आहेत. त्यामूळे पुण्यातून गावाकडं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. नऊ मार्चला कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची पुन्हा 23 मार्चला चाचणी घेण्यात येणार आहे. जर ही चाचणी निगेटिव्ह आली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा चाचणी घेऊन निकालाची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.