काबाडकष्ट करणारा शेतकरी चिंतातूर : उत्पादनात घट येण्याची शक्यता
रेडा – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा लाभल्याने अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सुरुवातीला पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेली होती. खरीप गेला. परंतु रब्बी हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु रब्बी हंगामात कायम ढगाळ वातावरण, आणि बेमोसमी पावसाची मारझोड सुरूच असल्यामुळे खरीप हंगामाबरोबर आता रब्बी हंगामावर संक्रांत ठेपली आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हिवाळा ऋतूच गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. ढगाळ वातावरण व पावसाच्या छटा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याची भिस्त पूर्णपणे शेतीवरच आहे. जगाचा पोशिंदा थंडी, ऊन, वारा, पाऊस यावर मात करीत आपल्या काळ्या आईची इमानदारीने सेवा करताना सातत्याने दिसत आहे. शेतकरी काबाडकष्ट करून देखील त्याच्या मेहनतीला निसर्ग साथ देत नाही. शेतकऱ्याची बिकट अवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे कृषिप्रधान भागाचे चित्र विदारक झाले आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा, निमगाव केतकी, वालचंदनगर, भिगवण, शहाजीनगर भागातील शेती मागील वर्षी कोरड्या दुष्काळाने वाळवंट झाली होती. त्यामुळे शेतीचा धंदा घाट्यात गेला होता.
शेतकऱ्यांनी धनदांडग्या लोकांकडून व्याजाने पैसे घेतले. ही रक्कम अद्याप फिटली नाही. आता कसेबसे विहिरी, बोअरमध्ये पाणी असल्यामुळे उभे पिक शेतात आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका, उन्हाळी ज्वारीच्या पेरण्या केल्या आहेत. पोषक वातावरण असताना आता अचानक दाट धुक्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.
थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. गहू, हरभरा पिकांना कडाक्याची थंडी पोषक असते. सतत ढगाळ वातावरण व मागील काही दिवसांत अचानक पडलेला पाऊस, रोज सकाळी धुक्यामुळे फुलोरा करपत आहे. त्यामुळे फळ आणि शेंगा तयार होत नाहीत. अळ्या व रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याला पुन्हा एकदा आर्थिक संकटात घातले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.