नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकाच्या (एनपीआर) मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत सोमवारी विरोधकांनी राज्यसभेत आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाज होऊ शकले नाही. गदारोळाची स्थिती कायम राहिल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
विरोधकांनी मागणी लावून धरत सत्ताधाऱ्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव मांडू दिला नाही. प्रामुख्याने कॉंग्रेस, तृणमूल, माकप, बसप या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी का आणि एनपीआरविरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी सरकारच्या विरोधातही घोषणा दिल्या. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करण्याची वेळ आली. विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही.