सातारा – माजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनीताईंना जाहीर केलेली वाढ व प्रेरक भत्ता तत्काळ अदा करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. मनेका गांधी यांच्या पत्रानुसार केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये वाढ आणि 500 रुपये प्रेरक भत्ता, मदतनीस यांना 750 रुपये वाढ व 250 रुपये प्रेरक भत्ता, मिनीताईंना 1250 रुपये वाढ आणि 500 रुपये प्रेरक भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते.
सेविका यांना 2000 रुपये, मदतनीस यांना 1000 रुपये, मिनी अंगणवाडीताईंना 1750 रुपये अशा मासिक वाढ मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात आश्वासन दिले. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलन कृती समितीने रितसर मार्गाने व संयमी कृतीने महिलांचे न्याय मागण्यांसाठी प्रयत्न केले. तरी शासनाने न्यायोचित प्रशासन केले नाही.
शासनाच्या प्रलंबित प्रशासनाच्या धोरणामुळे आंदोलन होत असून महिलांची मानधन कपात करण्यात येऊ नये. त्याचबरोबर केंद्र सरकारने जाहीर केलेली वाढ फरकासह सेवानिवृत्तीनंतर महिलांना शेवटच्या मानधनाच्या 50 टक्के मासिक पेंशन मिळावी. तसेच सेवानिवृत्त होण्याच्या दिवशी एकरकमी पेंशनचा धनादेश मिळावा. त्याचप्रमाणे सेविका-मदतनीस यांना अंगणवाडीवर 2 तास जादा काम करावे लागते.
अशावेळी घटनात्मकदृष्ट्या त्यांना मानधनाऐवजी पगार मिळाला पाहिजे. मदतनीस यांना सेविकेच्या 50 टक्के मानधन सप्टेंबर 2017 पासून फरकासह मंजूर करण्यात यावे. जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी तपासणीसाठी घेतलेली फी परत मिळावी आणि लोकसभा निवडणूकीत मतदान केंद्रावर बीएलओ म्हणून उपस्थित राहणाऱ्या महिलांचा भत्ता तत्काळ देण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.