बारामती( प्रतिनिधी) :- प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मेडद गावचा विकास खुंटला असून कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत गावातील महिलांनी बारामती पंचायत समितीसमोर आक्रोश आंदोलन केले.
तालुक्यातील मेडद हे गाव बारामती शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावरआहे. मात्र कामचुकार व दांड्या बहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे गावाची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी कधीही वेळेत हजर होत नाहीत तसेच अनेकदा गैरहजेरी असतात. आले तरी काम करत नाहीत त्यामुळे गावातील नागरिक हैरान झाले आहेत. याबाबत अनेक वेळा लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र कोणतीही कारवाई न करता नागरिकांच्या तक्रारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. असा आरोप देखील आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी यावेळी केला.
गेले पाच दिवस गावात पिण्याचे पाणी येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची ससेहोलपट होत आहे. गाव पातळीवरील मूलभूत समस्या वाढली असून विकास कामे देखील ठप्प झाले आहेत. त्यामुळे समस्येने हैराण झालेल्या तीस ते पस्तीस महिलांनी बारामती पंचायत समिती समोर आक्रोश आंदोलन केले. समस्यांबाबत मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना यावेळी देण्यात आले.
“ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामसेवक वारंवार गैरहजर असतात . ज्यावेळी ते कार्यालयात हजर असतात त्यावेळी ते कामचुकारपणा करतात. कार्यालयात आलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे गावात विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
-डॉ. उज्वला गावडे ( सरपंच )
याबाबत संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फसू तसेच आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील मिळत गावच्या महिलांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कामचुकार अधिकाऱ्यांची तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे यावेळी महिलांनी स्पष्ट केले.