भेंडी, गवार, मिरची, फ्लॉवरच्या दरात वाढ : पालेभाज्यांचे दरही पुन्हा उसळले
पिंपरी – मागील काही दिवसांपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसात शेतीपिकांबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे सध्या भाजी मंडईमधील भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे, पुढील काही दिवस नागरीकांना आणखी चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागण्याच शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झालेला पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, भात, मका, बाजरी, उडीद यासह अनेक पिकांचे नुकसान झाले. तर फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचेही परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले.
मागील दोन आठवड्यात होत असलेल्या पावसामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात राज्यभरातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील आठवड्यात मोशी येथील उपबाजार समितीमध्ये 999 क्विंटल फळभाजी, पालेभाज्याच्या 11 हजार 210 जुड्ड्यांची आवक झाली होती. तर या आठवड्यात यामध्ये पुन्हा घट होऊन फळभाज्याची केवळ 871 क्विंटल आवक झाली, तर पालेभाज्यांची 7 हजार 720 जुड्ड्या एवढीच आवक झाली आहे. मागील काही आठवड्यात पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने सातत्याने आवक घटत आहे. या आठवड्यात तर सरासरीच्या कमी आवक झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातही भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर पुढीलप्रमाणे (दर प्रतिकिलो रुपयात):
बटाटे : 15, कांदे : 55, टोमॅटो : 15 ते 20, गवार : 40, दोडका : 25 ते 30, घोसाळी : 45 ते 50, लसूण : 100, आले : 60, भेंडी : 25 ते 30, वांगी : 25 ते 30, कोबी : 10 ते 15, फ्लॉवर : 15 ते 20, शेवगा : 52 ते 60, हिरवी मिरची : 15 ते 20, शिमला मिरची : 25 ते 30, पडवळ : 50, दुधी भोपळा : 30, लाल भोपळा : 20 ते 25, काकडी : 20 ते 25, चवळी : 30, काळा घेवडा : 60 ते 70, तोंडली : 40, गाजर : 35 ते 40, वाल : 60, राजमा : 60, मटार : 70 ते 80, कारली : 30, पावटा : 25 ते 30, लिंबू : 400 (शेकडा).
पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (दर प्रतिजुडी, रुपयात)
कोथिंबीर : 26, मेंथी : 20, शेपू : 9, पालक : 6, मुळा : 10, तांदुळजा : 10,
पुदिना : 6.
लसूण दहा हजार, तर कांदा पाच हजारांवर
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, नवीन कांद्याच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. अशा स्थितीत बाजारात उपलब्ध असलेला जुना कांदाही संपत आलेला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या मोशी येथील उपबाजार समितीमध्ये कांदा 5 हजार 500 रुपये क्विंटल, तर लसूण 10 हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकला जात आहे.
कांदा, टोमॅटो, मिरची, फ्लॉवरसह अन्य पिकांचे मोठे नुकसान
सध्या खरीप हंगामातील पिकांबरोबरच सध्या काढणीला आलेला कांदा, टोमॅटो, मेथील, मिरची, फ्लॉवर यासह हंगामी भाजीपाला पिके काढणीला आली आहेत. मात्र, दिवाळीच्या आगोदरपासूनच राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काढणीला आलेल्या या पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन काढणीला आलेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.