वाल्हे -मागील वर्षी अतिवृष्टी, करोना संकटात सापडला शेतकरी वर्गाला यावर्षी दसरा-दिवाळीला झेंडू (गोंडा) फुलांना चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे. मागील काही दिवसांपासून सलग होत असलेल्या मुसळधार पावसाने, अनेक शेतकऱ्यांच्या झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले आहे.
दौंडज खिंड, तरसदरा, वाल्हे (ता. पुरंदर) या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते; मात्र मागील वर्षांपासून करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी झेंडू पिकांचे उत्पादन घेतले नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी झेंडू पिकांची लागवड केली ती होती, त्यामधील अनेकांची झेंडू अतिवृष्टीमुळे खराब झाले.
त्यामुळे आगोदर करोनामुळे हवादिल झालेला शेतकऱ्यांना झेंडूंच्या फुल विक्रीतून दोन पैशांचे उत्पादन मिळेल अशी आशा होती; मात्र दररोज होत असलेल्या पावसाने फुले खराब होऊ लागली असल्याने उत्पादनात घट होत आहे.
सणोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना जास्त मागणी असते. यामध्ये विषेशतः दसरा-दिवाळी तर झेंडूच्या फुलाशिवाय साजरीच होत नाही. यावर्षी झेंडू लागवडीचा काळ व करोनामुळे लॉकडाऊन एकाच वेळात आल्याने वाहतूक, बाजारपेठ बंद, चांगल्या प्रतीचे रोपांच तुटवडा, लॉकडाऊनबाबतची अनिश्चिता, सर्व ठिकाणी मंदिरे किती दिवस बंद राहणार याचा अंदाज नसलाने शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत झेंडूची लागवड कमी प्रमाणात केली.
कुलदैवत असलेल्या जेजुरीचा मर्दानी दसरा उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येतात. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरच अनेक शेतकरी आपल्या शेतामधील झेंडू विकण्यासाठी दौंडज खिंड ते वाल्हे परिसरामध्ये बसतात. जेजुरीला येणारे भाविक आवर्जून थांबून झेंडूच्या फुलांची खरेदी करतात.
जेजुरीची बाजारपेठ झेंडूच्या विक्रीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तसेच, जवळच असलेल्या जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्येही खंडेनवमीसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते; मात्र यंदा मर्दानी दसरा रद्द केल्याने आणि झेंडूचे उत्पादन अत्यल्प प्रमाणावर असल्याने गुरुवारी (दि. 14) आणि दसऱ्याच्या दिवशी शुक्रवारी
(दि. 15) भाव वाढणार की पडणार हे स्पष्ट होणार आहे.
आज 200 रुपये किलो भाव मिळणार?
झेंडूच्या फुलांना बुधवारी (दि. 13) दुपारपर्यंत 60 ते 80 रूपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत होता. सायंकाळ नंतर फुलांना 125 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला होता. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच
गुरुवारी (दि. 13) 200 रूपये प्रतिकिलो बाजारभाव मिळण्याची अपेक्षा शेतकरी संभाजी कदम, रवींद्र जाधव, शिवाजी कदम, बाबासाहेब कदम, विनायक जाधव, रामदास भोसले, जगन्नाथ जगताप, रमेश घोगरे यांनी व्यक्त केली आहे.